अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादात सापडलं होतं. या गाण्यात दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. या वादावर अनेक भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया देत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटांबद्दल भाष्य करणाऱ्या भाजपा नेत्यांना सल्ला दिला. या सल्ल्याचं इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष इंडियन अशोक पंडित यांनी स्वागत केलंय. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना ते म्हणाले, "पंतप्रधान जर आपल्याच लोकांची कानउघाडणी करत असतील आणि त्यांना चित्रपट इंडस्ट्री, जे त्यांचे क्षेत्र नाही, त्याबद्दल फक्त प्रसिद्धीसाठी बोलू नका आणि गप्प राहा, असं सांगत असतील, तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण देशाचे पंतप्रधान आमच्याबरोबर आहेत, असा आत्मविश्वास आम्हाला त्यातून मिळतो. ही गोष्ट फक्त राजकारण्यांनाच नाही तर मीडियातील लोकांना आणि इंडस्ट्रीचा भाग असून त्याविरोधात बोलणाऱ्या लोकांनाही लागू पडते," असं अशोक पंडित यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? “आपण दिवसभर काम करत असतो. तर, काहीजण चित्रपटांबद्दल विधानं करत असतात. याची दिवसभर माध्यमांत चर्चा होत राहते. त्यामुळे नेत्यांनी चित्रपटाबद्दल अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहिलं पाहिजे,” असं पंतप्रधान मोदी नेत्यांना म्हणाले. दरम्यान, 'बेशरम रंग' गाण्यावर वाद झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, भाजपाचे राम कदम यांनी आक्षेप घेतला होता. 'पठाण' चित्रपट मध्य प्रदेशमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही मिश्रा यांनी दिला होता.