बॉलिवूडमध्ये ऑनस्क्रीन पिळदार शरीर दाखवणे आता काही नवे राहिलेले नाही. सलमान खान, शाहरुख खान, ह्रतिक रोशन, वरुण धवन यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी आपल्या पिळदार शरीराचे जाहिर प्रदर्शन करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. परंतु ऑनस्क्रीन शर्ट उतरवण्याच्या या ट्रेंडची खरी सुरुवात केली होती, ती प्रसिद्ध अभिनेता आणि पैलवान दारा सिंग यांनी. त्यांनी महाबली हनुमान यांच्या रुपाने आपल्या पिळदार शरीराचे जाहिर प्रदर्शन केले होते. परंतु कुस्तीपटू दारा सिंह यांना रामायणातील हनुमानाची भूमिका मिळाली तरी कशी? रामानंद सारग यांनी 'रमायण' या मालिकेची निर्मिती केली होती. ९०च्या दशकात तुफान लोकप्रियता मिळवलेल्या या मालिकेत हनुमानरुपी दारा सिंह यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रामानंद सारग यांचा मुलगा प्रेम सारग याने आज तकला दिलेल्या मुलाखतीत दारा सिंह यांच्या निवडीचा गंमतीशीर किस्सा सांगितला. रमायण मालिकेतील कलाकारांचा विचार करत असताना हनुमान या व्यक्तिरेखेसाठी त्यांच्यासमोर दारा सिंह हा एकमेव चेहरा सातत्याने येत होता. त्यांचं पिळदार शरीर, जबदस्त व्यक्तिमत्व आणि बोलण्याची शैली यामुळे ते फारच प्रभावीत झाले होते. त्यांनी एका रविवारी दारा सिंह यांना फोन केला आणि रामायण मालिकेत काम करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांचं वय ६० वर्ष होतं त्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्यांच्या ऐवजी एखाद्या तरुण तडफदार पैलवानाला काम करण्याची संधी द्यावी असाही सल्ला त्यांनी रामानंद सारग यांना दिला. मात्र ते आपल्या मतावर ठाम होते. त्यांनी अनेकदा विनंती केल्यावर अखेर दारा सिंह हनुमान साकारण्यासाठी तयार झाले. पुढे या भूमिकेने इतिहास रचला. अशी निवड झाली होती दारा सिंह यांची. दारा सिंग बॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुर्ण नाव ‘दारा सिंग रंधावा’ असे होते. त्यांचा जन्म १९२८ साली पंजाब येथे झाला होता. त्यांचे लग्न वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी झाले होते. त्यांची पत्नी बचनो कौर त्यांच्या पेक्षा वयाने मोठी होती. त्यांनी या लग्नाला विरोध केला, परंतु कुटुंबियांनी जबरदस्तीने त्यांचे लग्न लावून दिले. पुढे वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना एक मुलगा झाला. खरं तर त्यांना कुस्तीची आवड होतीच, पण त्यांनी कुटुंबाच्या पालन पोषणासाठी व्यवसायिक कुस्तीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल २०० किलो वजनाच्या किंग कॉन्ग या ऑस्ट्रेलियन पैलवानाला हरवले होते. त्यांनी त्याला अक्षरश: रिंगच्या बाहेर फेकून दिले होते. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झोतात आले. या अनोख्या पराक्रमामुळे त्यांना १९६३ साली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये काम केले होते. २००७ साली 'जब वी मेट' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.