संगीत जगतामध्ये आपल्या अनोख्या गायनशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी गायिका म्हणजे सुनिधी चौहान. सुनिधीने आतापर्यंत अनेक लोकप्रिय गाण्यांना आवाज दिला आहे. तर जोधा अकबर, वजीर या चित्रपटांसाठी आवाज दिलेला जावेद अली याचीही तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही लोकप्रिय गायक ‘एक थी बेगम’ या सीरिजच्या निमित्ताने एकत्र आले. या सीरिजमधील गाजलेल्या गाण्यांना या दोघांचा स्वरसाज लाभला आहे.
‘एक थी बेगम’ या सीरिजमधील ‘रब क्यूं खफा’ आणि ‘चुभती है तन्हाईया’ ही दोन गाणी सुनिधी आणि जावेद अलीने गायली असून ही दोन्ही गाणी सध्या लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे सध्या हे दोघं आमने-सामने असल्याचं पाहायला मिळत आहे. ही दोन्ही गाणी अमितराज याने संगीतबद्ध केली आहेत. जावेदने ‘चुभती है तन्हाईया’ हे गाणं गायलं असून सुनिधीने ‘रब क्यूं खफा’ या गाण्याला तिचा आवाज दिला आहे.
‘चुभती है तन्हाईया’ हे गीत तुमच्या प्रियजनांसोबत असलेल्या आठवणींबद्दल व्यतीत होणारे आहे. हे गाणे प्रेमाची भावना व्यक्त करणारे आहे त्याचबरोबर त्यातील दुःख आणि आव्हाने ही भासवणारे आहे. हे अमितराज यांनी तयार केलेले सुंदर गाणे असून जावेद यांनी खूप छान गायले आहे’. असं दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “चुभती है तन्हाईया’ प्रमाणेच ‘रब क्यूं खफा’ हे गाणंही हृदयाला स्पर्श करणारं आहे. हे गाण एकाच वेळी हृदयस्पर्शी त्याचबरोबर दुःख व्यक्त करणार आहे. या गाण्यासाठी मी सुनिधी शिवाय कोणाचाही विचार करू शकलो नसतो कारण तिने या गाण्याला तिच्या आवाजातून जीवंत केले आहे.”
दरम्यान, सध्या एमएक्स प्लेअरवर ‘एक थी बेगम’ ही सीरिज प्रचंड गाजत आहे. या सीरिजमधून एक सूडकथा उलगडण्यात आली आहे. ही सीरिज१४ भागांची असून यात अनुजा साठे, अंकित मोहन, अजय गेही, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर हे कलाकार मुख्य भूमिका झळकले आहेत.