‘रंगीला’ या सिनेमातून यशाच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आचृज वाढदिवस. साध्या सरळ मुलीपासून ते आधुनिक मुलीपर्यंतचा प्रवास उर्मिलाने या सिनेमात फार सुरेखरित्या साकारला होता. उर्मिलाने आतापर्यंत मराठी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम सिनेमात काम केले आहे.

४ फेब्रुवारी १९७४ मध्ये मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला होता. ‘झाकोळ’ (१९८०) या मराठी सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. १९८१ मध्ये आलेल्या कलयुग या हिंदी सिनेमातही तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. पण तिला खरी ओळख मिळाली ती मासून या सिनेमातून.१९९१ मध्ये आलेली ‘नरसिंह’ हा उर्मिलाचा पहिला मुख्य अभिनेत्री असलेला सिनेमा. या सिनेमापासूनच तिला ओळख मिळत गेली आणि तिच्या कामावर दिग्दर्शक लक्ष ठेवू लागले.

‘चमत्कार’ या सिनेमात शाहरुखसोबतही काम केले होते. पण राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला या सिनेमामुळे ती एका रात्रीत स्टार झाली होती. या सिनेमात तिने एक नावाजलेली अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. सिनेमातला उर्मिलाचा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच आवडला होता. याशिवाय ‘जुदाई’ या सिनेमातही उर्मिलाने, श्रीदेवीसारख्या अभिनेत्रीला टक्कर दिली होती. तर दुसरीकडे राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’ या सिनेमात तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची वाहवा मिळवली होती. तर ‘चायना गेट’ या सिनेमातले ‘छम्मा- छम्मा’ हे आयटम साँग आजही अनेकांच्या लक्षात आहे.

‘भूत’ या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअरचा समिक्षक पुरस्कार मिळाला होता. तसेच अमृता प्रीतम यांच्या ‘पिंजर’ या कादंबरीवर आधारित सिनेमातील तिच्या गंभीर भूमिकेतून तिने तिची अभिनय क्षमता दाखवून दिली होती. तर दुसरीकडे ‘प्यार तुने क्या किया’ या सिनेमात प्रेमासाठी कोणत्याही थरापर्यंत जायला तयार असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या सिनेमातल्या तिच्या अभिनयाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती.

उर्मिलाने दीवानगी या सिनेमात प्रेमाच्या भावनांचे फार सुरेखरित्या चित्रिकरण केले होते. ‘तहजीब’, ‘एक हसीना थी’, ‘कुंवारा’, ‘जंगल’, ‘बनारस’, ‘अ मिस्टिक लव स्टोरी’ यांसारख्या सिनेमातही तिने काम केले आहे. हे सिनेमे जरी बॉक्स ऑफिसवर फार चालले नसले तरी उर्मिलाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. उर्मिलाने छोट्या पडद्यावर कथा सागर, इंद्रधनुष, चक धूम-धूम डान्स महाराष्ट्र डान्स या टीव्ही शोमध्ये काम केले होते.

उर्मिला, राम गोपाल वर्माची आवडती अभिनेत्री होती. दोघांच्या प्रेमसंबंधांनी तेव्हाचे वृत्तपत्राचे रकानेही भरायचे. पण त्यांच्या प्रेमावर लग्नाची मोहर काही लागली नाही. त्यामुळे दोघांचेही रस्ते वेगळे झाले. ३ मार्च २०१६ मध्ये उर्मिलाने, तिच्याहून ९ वर्ष लहान मोहसिन अख्तर मीर या व्यावसायिकासोबत लग्न केले. २००७ मध्ये मोहसिन मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा उपविजेता ठरला होता. त्याने झोया अख्तरच्या लक बाय चान्स या सिनेमातही काम केले आहे.

२०१४ मध्ये उर्मिलाने ‘आजोबा’ या मराठी सिनेमात काम केले होते. तिचे चाहते तिला आजही सिनेमात काम करण्यासाठी सतत सांगत असतात. आम्हालाही उर्मिला मातोंडकरचा अभिनय पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा नक्कीच आहे.