बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामधील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. या दोघांमधील या वादाला एक वर्ष झालं असून ‘द कपिल शर्मा शो’च्या येणाऱ्या भागासाठी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता गेस्ट महणून येणार आहेत. त्यामुळे या भागासाठी कृष्णा अभिषेकने नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. एकेकाळी लोकप्रिय असलेली ही मामा आणि भाच्याची जोडी त्यांच्यामधील सुरू असलेल्या वादामुळे आज एक दुसऱ्याशी बोलतसुद्धा नाहीत.

कृष्णा आणि गोविंदा मधील वाद हा कृष्णाची पत्नी कश्मीराच्या एका ट्वीटवरुन सुरू झाला. त्यामुळे गोविंदा आणि कृष्णामधील संबंध खराब झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणं सोडून दिलं. हे दुसऱ्यांदा आहे जेव्हा कृष्णाने गोविंदासोबत काम करायला नकार दिला असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर आपले मत मांडताना कृष्णा अभिषेकने एका मुलाखतीत सांगितलं , “गेल्या १५ दिवसांपासून माझा रायपुर ते मुंबई सतत प्रवास सुरू आहे. मी कपिल शर्मासाठी माझ्या डेट्स दिलेल्या असतात. मात्र जेव्हा मला कळलं की शो मध्ये ते (गोविंदा आणि सुनीता) येणार आहेत तेव्हा असूनही सुद्धा मी माझ्या डेट्स अॅडजस्ट केल्या नाहीत. कारण मला त्याच्या सोबत काम करायचे नव्हते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

कृष्णा पुढे सांगतो,” मला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. माझ्या मते त्यांचं पण हेच मत असेल. हा एक कॉमेडी शो आहे आणि परत आम्ही एकत्र दिसलो आणि पुन्हा तेच होईल मी काही बोलेन आणि त्यावर वाद होईल  हे मला नको आहे… मला खात्री आहे की आम्ही एकत्र दिसलो की लोकं चर्चा करणार त्यामुळे हेच योग्य आहे की जेव्हा ते शो मध्ये असतील तेव्हा मी तिथे नसेन आणि माझ्यामुळे संपूर्ण टीमचे संबंध खराब होणार नाहीत.”

२०१९ मध्ये सुद्धा गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कृष्णाने शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. अनेकांनी कृष्णाला यामागचे कारण विचारले होते. त्यावर कृष्णाने त्याच्या आणि गोविंदामध्ये थोडे वाद सुरु आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विनोद करणे शक्य नसल्याचे म्हटले होते.