टेलिव्हिजन विश्वात काही कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली होती. छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या काही मालिका बंद होऊन इतकी वर्षे उलटली तरी अजूनही त्यातील पात्र, मालिकेचे कथानक, शीर्षक गीत या साऱ्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम जाग्या असल्याचे बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. अशाच मालिकांच्या गर्दीतील एक उदाहरण म्हणजे, ‘खिचडी’. हा कार्यक्रम नव्या अंदाजात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, यावेळी खास तडक्यासह ही ‘खिचडी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घेऊयात या मालिकेच्या नव्या सिझनबद्दल..

-१४ एप्रिलपासून नवीन सिझन प्रसारित होणार असून ‘खिचडी रिटर्न्स’ असे त्याचे नाव असणार आहे.

-स्टार प्लस वाहिनीवर आठवड्याअखेर रात्री ९ वाजता ही एक तासाची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

-मालिकेच्या नव्या पर्वाच्या निमित्ताने महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या कलाकारांच्या साथीने काही नवे चेहरे पाहण्याची संधी सुद्धा प्रेक्षकांना मिळणार आहे. अनंत देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि जमनादास मजीठिया यांचे विनोदी कुटुंब पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

-या कलाकारांशिवाय आणखी काही जण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. यामध्ये रेणुका शहाणे, रत्ना पाठक शहा आणि दिप्शिका नागपाल या अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे.

२००२ मध्ये ‘खिचडी’च्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली होती. एका गुजराती कुटुंबातील व्यक्तींचे स्वभाव, त्यातून उडणारे खटके आणि त्यांचे विनोद अशा हलक्याफुलक्या कथानकाला या मालिकेतून न्याय देण्यात आला होता. त्यानंतर २००५ मध्ये ‘इन्स्टंट खिचडी’ या नावाने मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. सलग दोन्ही पर्वांना मिळालेले यश पाहता आता हे हटके कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे.