रवींद्र पाथरे

सत्तर-ऐंशीच्या दशकांत मुंबईतील चाळसंस्कृती आणि तिथल्या लोकांचं जगणं काही अंशी तरी मराठी रंगभूमीवर येत असे. पण मराठी नाटकांचा सर्वसाधारण प्रेक्षक हा सहसा मध्यमवर्गीयच असल्याने त्यांचं जीवन चितारणारीच नाटकंच- मग ती शोकांतिका असो किंवा सुखात्मिका असो- तेव्हा प्रामुख्यानं येत असत.. आजही येतात. गिरणी संपाच्या अपयशी लढयानंतर तर कष्टकरी कामगारवर्गच मुंबईबाहेर फेकला गेल्याने अलीकडच्या काळात त्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब असणारी नाटकं येणंही बंदच झालंय. अशात ४४ वर्षांपूर्वीचं वामन तावडे लिखित ‘छिन्न’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं धाडस दिग्दर्शक अभय पैर यांनी केलं आहे. वामन तावडे हे कनिष्ठवर्गीयांच्या व्यामिश्र, गुंतागुंतीच्या आयुष्याचं चित्रण करणारे एक नाटककार. पण कालौघात ते रंगभूमीवरून दिसेनासे झाले. काही वर्षांपूर्वी ‘रज्जो’ हे त्यांचं नाटक आलं होतं, पण ते काही प्रयोगांतच बंद पडलं. अशा वामन तावडे यांचं एकेकाळी गाजलेलं ‘छिन्न’ हे स्मिता पाटील आदींच्या भूमिकांमुळे गाजलेलं नाटक पुनश्च रंगमंचावर आणण्याचं साहस अभय पैर यांनी केलं आहे.. तेही ते न पाहिलेल्या मंडळींना घेऊन!

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
may month personality know may month born people traits nature career and personality
मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात ‘हे’ खास गुण! आयुष्यात कमावतात भरपूर पैसा-प्रतिष्ठा
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना

हेही वाचा >>> ‘सापळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दोन वेळा हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील झालेल्या गिरणगावातील चाळीतील एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. आप्पा, सिंधू या दाम्पत्याची अरुण आणि शालू ही मुलं. या कुटुंबाचं घर श्रीकांत या आश्रित तरुणाच्या मदतीमुळे कसंबसं चाललंय. आप्पा गिरणीत कामाला आहेत. त्यांना दारूचं व्यसन आहे. रात्रपाळी-दिवसपाळीचं त्यांचं रहाटगाडगं सुरू असतं. त्यांची बायको सिंधू श्रीकांतच्या भरवशावर कसंबसं घर सांभाळतेय. शाळेत जाणाऱ्या शालू आणि अरुण या मुलांचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीए. शालू आता अठरा वर्षांची होऊ घातलीय. तिचं श्रीकांतशी लग्न लावून देण्याचं सिंधूच्या मनात आहे. पण शालूनं लहानपणापासून श्रीकांतकडे मोठया भावाप्रमाणेच पाहिलेलं असल्याने ती आईच्या म्हणण्याला साफ विरोध करते. आप्पांना घरात कोणतंच स्थान नाहीए. ते फक्त घरात असतात म्हणून असतात. त्यांनाही याची पुरती कल्पना आहे. त्यामुळे ते शालूच्या श्रीकांतबरोबरच्या लग्नाच्या विरोधात असूनही सिंधू त्यांचं काहीएक न ऐकता दोघांचं लग्न लावून देते. त्यामुळे श्रीकांत घरजावई बनून घरातच राहणार असल्याने घर चालवणं सिंधूला सोपं जाणार असतं.

आणखीही एक गोष्ट असते : सिंधूचे श्रीकांतबरोबर संबंध असतात. श्रीकांतने शालूशी लग्न केल्याने तेही आपसूकच धकून जाणार असतात. एकाच दगडात दोन पक्षी सिंधूने मारलेले असतात. पण शालूला त्यांच्या या संबंधांबद्दल शंका असते. नव्हे खात्रीच असते, की श्रीकांतचे आपल्या आईबरोबर ‘तसले’ संबंध आहेत. आणि त्यासाठीच आईने आपलं त्याच्याशी लग्न लावून दिलं आहे. या खातेऱ्यातून बाहेर पडायचं तर या घरातूनच आपल्या दोघांना बाहेर पडायला हवं. ती त्यासाठीच श्रीकांतच्या मागे लकडा लावते. पण पैशांचं कारण पुढे करून श्रीकांत तिचं म्हणणं बराच काळ टाळायचा प्रयत्न करतो. शेवटी ती स्वत:च घराबाहेर पडते, तेव्हा नाइलाजानं श्रीकांतलाही या घराबाहेर पडणं भाग पडतं.

मात्र, एके दिवशी श्रीकांत आणि आपल्या आईला नको त्या अवस्थेत अरुण पाहतो आणि चीड, संताप व उद्विग्नतेनं तो आत्महत्या करतो. त्याच्या जाण्याने सगळं घरच विस्कटतं. सिंधूलाही त्याच्या जाण्याचा मोठाच धक्का बसतो. आप्पा सैरभैर होतात. या घटनेनं शालूही भयंकर बिथरते. ती श्रीकांतला या घरी येण्यापासून मज्जाव करते. त्यामुळे श्रीकांतची इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था होते. सगळं घर अस्ताव्यस्त होतं. सिंधू त्यातूनही हळूहळू सावरते. आप्पांच्या तिच्यावरील संतापाला सामोरं जाताना ती त्यांच्या फाटक्या संसारातलं वास्तव त्यांना बोलून दाखवते. त्यांच्यामुळेच आपण या मार्गाकडे वळलो असं ती त्यांना सुनावते. त्याने आप्पा कानकोंडे होतात.. अधिकच आक्रसून जातात.

हेही वाचा >>> अभिमानास्पद! हॉलिवूड स्टार्ससाठी न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात येणार ‘सत्यशोधक’चा खास प्रीमियर

एके दिवशी श्रीकांत न राहवून या घरी येतो. तेव्हा सिंधू पुन्हा एकदा त्याच्याकडे ओढली जाते. त्याला आपला भूतकाळ कथन करते. आपलं तारुण्यापासूनचं वासनांध असणं त्याच्यापुढे उघड करते. याचवेळी शालूही तिथं येते आणि त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून ती स्वत:वरचा ताबा हरवून बसते..

वामन तावडे यांनी माणसांची स्खलनशीलता आणि त्यातून त्यांच्या आयुष्यात होणारे भयंकर गुंते या नाटकात अत्यंत व्यामिश्रतेनं मांडले आहेत.. मग तो पुरुष असो वा स्त्री! हे जेव्हा लपूनछपून चालतं, तोवर ठीक असतं. पण ते एकदा का उघडयावर आले की सगळ्याचाच विस्कोट होतो. काही वेळा परिस्थितीच्या तकाज्यामुळे कुटुंबाचं स्थैर्य राखण्यासाठी अशा संबंधांकडे नाइलाजास्तव काणाडोळाही करण्यात येतो. परंतु घरातल्या मुलांवर आणि मोठयांवरही याचे अनिष्ट परिणाम होतात. सगळं कुटुंबच्या कुटुंब त्यात ध्वस्त होतं. या साऱ्याचं विश्वरूप दर्शन लेखकानं ‘छिन्न’मध्ये घडवलं आहे. चाळीतलं जीवन, कुटुंबातले नातेसंबंध, त्यातले नैतिक-अनैतिक तिढे, त्याचे कुटुंबावर होणारे दृश्य-अदृश्य परिणाम, परिस्थितीवश आघात, या सगळ्याला सामोरी जाणारी हाडामांसाची, गुणदोषयुक्त माणसं, त्यांचे निरनिराळे गंड, व्यक्त-अव्यक्त राहणं, त्यांचं त्यातून पिचत, खचत जाणं.. हे सारं अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीनं लेखकानं या नाटकात रेखाटलं आहे.

दिग्दर्शक अभय पैर यांनी सत्तरच्या दशकातलं गिरणगावातलं चाळजीवन अत्यंत परिणामकारकतेनं प्रयोगात उभं केलं आहे. चाळसंस्कृतीतला तपशील बारीकसारीक घटना-प्रसंगांतून त्यांनी मांडला आहे. सिंधू आणि श्रीकांतमधील संबंध कधी सूचकतेनं, तर कधी उघडपणे यात येतात. त्याचे परिणाम साऱ्या घरादारावर होतात. पण चाळसंस्कृतीत त्याबद्दल कधी कधी मुग्धताही पाळली जाते. कारण तिथं सगळ्यांचीच आयुष्यं सगळ्यांनाच माहीत असतात. या सगळ्यासकट त्यांनी परस्परांना स्वीकारलेलं असतं. त्यामुळे जोवर अरुण त्या दोघांना (श्रीकांत व सिंधूला) रंगेहात पकडत नाही तोवर त्यांचे संबंध सुखेनैव धकून जातात. पण ते कळल्यावर अरुणने केलेल्या आत्महत्येनं या संबंधांना वाचा फुटते. या घटनेनंतर या कुटुंबाचा प्रवास धारेला लागतो आणि त्याचा अपरिहार्य शेवटही अटळ ठरतो. दिग्दर्शकाने गिरणगावातल्या एका कुटुंबाची ही कहाणी कुणाचीही बाजू न घेता आहे तशी मांडली आहे. फक्त त्यांनी एक करायला हवं होतं : नाटक थोडं संपादित करण्याची गरज होती. सिंधूचा भूतकाळ पुन्हा दृश्यस्वरूपात मांडण्याची काही गरज नव्हती. या वास्तवदर्शी नाटकातले तिढे पाहणाऱ्याच्या अंगावर येतात, हे या नाटकाचं यश आहे. दिग्दर्शकानं सगळी पात्रं, त्यांच्यातले ताणेबाणे, परस्परसंबंध वास्तवतेनं हाताळले आहेत. ते कुठंही भडक होऊ न देता संयमितपणे मांडले आहेत. अर्थात त्याचा आवश्यक तो परिणाम घडवण्यात मात्र ते कुठंही कमी पडत नाहीत. नाटकातले काही प्रसंग मात्र संकलित केले असते तरी चालले असते. नाटकाच्या एकूण परिणामात त्याने काही फरक पडला नसता. असो.

नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी गिरणगावातील चाळ आणि त्यातलं एका कुटुंबाचं घर त्यातील पोटमाळ्यासह सूक्ष्म तपशिलांनिशी उभं केलं आहे. प्रकाशयोजनाकार श्याम चव्हाण यांनी बल्बच्या यथायोग्य उपयोजनातून घटना-प्रसंगांचं ठळकपण अधोरेखित केलं आहे. बिपीन वर्तक आणि नंदलाल रेळे यांनी पार्श्वसंगीतातून ‘तो’ काळ उभा केला आहे. अनिकेत वंजारे (वेशभूषा) आणि उदयराज तांगडी (रंगभूषा) यांनी सर्वच पात्रांना (तत्कालीन) बाह्य़ रूप प्रदान केलं आहे.

या नाटकातील अत्यंत कठीण अशी भूमिका पूजा नायक (सिंधू) यांनी त्यातल्या गुंतागुंतीसह संयमानं साकारली आहे. तिची स्खलनशीलता आणि इतर वेळचं नॉर्मल वागणं-बोलणं यांचा समतोल त्यांनी नेमकेपणानं सांभाळला आहे. परिस्थिती माणसाला कसकसं घडवते वा बिघडवते याचा वस्तुपाठ सिंधू या पात्रात दिसतो.. आणि तीव्रतेनं जाणवतोही. श्रीकांतची द्विधा मन:स्थिती, त्याचं दुभंग व्यक्तिमत्त्व, त्याची परिस्थितीनं केलेली गोची आणि त्याचं त्यात वाहवत जाणं अभिजीत धोत्रे यांनी बारकाव्यांनिशी साकारलंय. कांचन प्रकाश यांची शालू ही परिस्थितीचा बळी ठरलेली, त्यातून बाहेर पडण्यासाठी तगमगणारी आणि त्यात अपयश आल्याने अखेरीस मनोरुग्ण झालेली तरुणी म्हणून चपखल ठरलीय. अभय पैर यांनी आप्पांचं परिस्थितीवश तसंच व्यसनांधतेनं आक्रसलेलं व्यक्तिमत्त्व, त्यांची अगतिकता, शहामृगी वृत्ती, त्यांचं मधूनच स्वाभिमान फणा काढून चवताळणं.. ही सगळी भावआंदोलनं यथार्थपणे मूर्त केली आहेत. चैतन्य म्हात्रे यांचा सदा ओशाळलेल्या व्यक्तिमत्त्वाचा शांत्या, नवसाजी कुडव यांचा उनाड, बिनधास्त वृत्तीचा अरुण, चंद्रशेखर मिराशी यांनी साकारलेला दारूडा शेजारी, सुगत उथळे (मित्र), निकिता सावंत (भाजीवाली), सृष्टी शेलार (मैत्रीण), ऐश्वर्या पाटील (छोटी सिंधू), अनिकेत वंजारे (सुधीर धारिया) आणि प्रतीक ठोंबरे (पोस्टमन आणि पोलीस) या सगळ्यांनीच आपापल्या भूमिका मन लावून केल्या आहेत.  एक आशयसंपन्न आणि अर्थपूर्ण नाटक पाहिल्याचं समाधान ‘छिन्न’ देतं यात बिलकूल शंका नाही.