मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. भारतात परतल्यानंतर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सोमवारी तिने मुंबईतील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतापेक्षा जास्त सुंदर मुली तिथे बुरख्यात आहेत, अशा पद्धतीच्या चर्चा सध्या पाकिस्तानात होत आहे. याचसंदर्भात तिला तिचे मत विचारण्यात आले.

https://www.instagram.com/p/BcB0Zkrjmrd/

यावर उत्तर देताना मानुषी म्हणाली की, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, ही फक्त बाह्य सौंदर्याची स्पर्धा नव्हती. या स्पर्धेतील प्रत्येक मुलगी सुंदर होती. पण त्या स्पर्धेत बाह्य सौंदर्यासोबतच तुमचं मन कसं आहे हेही पडताळून पाहिलं जातं. बाह्य शारीरिक सौंदर्यापेक्षा तुम्ही इतर गोष्टींना आणखी सुंदर करण्यासाठी कसा आणि किती प्रयत्न करता, ही गोष्ट या स्पर्धेत फार महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करता ही गोष्ट फारशी महत्त्वपूर्ण नसते. ही गोष्ट त्या व्यक्तीची आहे जी जगाच्या कल्याणासाठी योग्य योगदान देऊन काही बदल घडवू शकेल.

https://www.instagram.com/p/Bb7-dsyjXUs/

या प्रश्नाव्यतिरिक्त तिने बॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल उत्तर देताना म्हटले की, ‘सध्या तरी हिंदी सिनेमांमध्ये काम करण्याचा माझा कोणताही विचार नाही. मात्र, भविष्यात तशी वेळ आलीच तर मला आमिरसोबत काम करायला आवडेल. ‘सिनेसृष्टीत सर्वच कलाकार प्रतिभावान आहेत. पण, मला आमिर खानसोबत काम करायला फारच आवडेल. कारण तो नेहमीच आव्हानात्मक भूमिकांना न्याय देतो. त्याच्या सिनेमांतून समाजाच्यादृष्टीने काही महत्त्वाचे संदेश देण्यात येतात. पण, त्याशिवाय सर्वसामान्यही त्याच्या सिनेमाशी सहजपणे जोडले जातात’, असेही तिने या यावेळी म्हटले.