प्रिया बापट ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने मालिका, नाटकं, मराठी चित्रपट व हिंदी वेब सीरिज अशा विविध माध्यमांत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रिया उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती खूप स्पष्टवक्तीदेखील आहे. आता एका मुलाखतीत प्रियाने तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. ती रस्त्याने चालत असताना एका पुरुषाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. ‘हॉटरफ्लाय’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने हा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

२०१० मध्ये दादरमध्ये माझ्या घरासमोरच्या गल्लीत ही घटना घडली होती, असं प्रियाने सांगितलं. “मी शूट संपवून घरी परत येत होते. माझ्या हातात पिशव्या होत्या आणि मी फोनवर बोलत चालत होते. कानाला फोन होता, हातात पिशव्या घेऊन मी जात होते. एक माणूस समोरून आला, त्याने माझे स्तन पकडले आणि तो पळून गेला. काय घडलंय हे समजायला मला तीन सेकंद लागले. मी तिथे स्तब्ध उभी होते, मला कळतच नव्हतं की काय घडलंय. मी मागे वळून पाहिलं तर तो तिथे नव्हता, तो पळून गेला होता. काही क्षणात तो तिथून गायब झाला होता,” असं प्रिया म्हणाली.

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन

घडलेला प्रकार बाबांना सांगितला

“मी घरी गेले, दुर्दैवाने आई घरी नव्हती, बाबा होते. मला कळत नव्हतं की जे घडलंय ते बाबांना कसं सांगावं. मी सारखी रडत होते, माझ्या बाबांनी विचारलं की काय झालंय? मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मी माझ्या बाबांकडे बघितलं तर त्या क्षणी ते खूप असहाय्य वाटत होते. जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. ‘अशा गोष्टी होत असतात,’ असं काहीच ते बोलले नाहीत. तसंच हे तुझ्याबरोबर घडायला नको होतं, मी त्याला मारेन, असंही ते म्हणाले नाहीत. कारण मारणार तरी कसे?” असं प्रिया म्हणाली.

“तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्याचं आईच्या घटस्फोटाबद्दल विधान; म्हणाला, “तिची बाजू…”

त्या घटनेनंतरचा राज आजही मनात

ज्या माणसाने हे केलं त्याचा उद्देश काय असेल, असा प्रश्न मुलाखतकाराने विचारल्यावर प्रिया म्हणाली, “मला वाटतं त्याला कदाचित आनंद घ्यायचा असेल. त्याला रस्त्यावर एक महिला दिसली, जिचे हात रिकामे नव्हते, त्यामुळे त्याला वाटलं की ही काहीच करू शकणार नाही. मी असहाय्य होते आणि त्याने त्या परिस्थितीचा फायदा उचलला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं. तेव्हापासून आजवर जर मला कुणाची नजरही वाईट असल्याचं जाणवलं की मला वाटतं ती व्यक्ती येऊन मला स्पर्श करेल, त्याआधी मी जाऊन त्याला पकडावं आणि मारावं. तेव्हाचा राग माझ्यात अजूनही आहे.”