‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर हे घराघरांत लोकप्रिय झाले. पुढे, काही वर्षांनी रोहित-जुईली खऱ्या आयुष्यात एकत्र आले. एकमेकांना काही वर्षे डेट केल्यावर २०२२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. परंतु, लग्नाआधी काही वर्षे या जोडप्याने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच ‘दिल के करीब’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत या जोडप्याने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित म्हणाला, “लग्नानंतर तू अशी असशील असं मला वाटलं नव्हतं किंवा तू आता असं वागतोय…हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही लोक आधीच एकमेकांबरोबर राहा. तेव्हाच ठरवा आपण एकमेकांना किती ओळखतो, किती समजून घेतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीप्रमाणे मुलाचं आयुष्य सुद्धा बदलतं. आम्ही दोघंही एकमेकांशी याबाबतीत बोललो आणि मग विचार केला. आपण असं लिव्ह इनमध्ये राहुया का? घरच्यांशी बोलुया का? किंवा असं राहिलेलं आमच्या घरी चालेल का? जर त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं हे तत्त्वांच्या बाहेर वाटत असेल तर आम्ही आणखी काहीतरी मार्ग पाहतो असं सगळं आम्ही ठरवलं होतं.”

हेही वाचा : Video : ‘गुलाबी साडी’ गाण्याची नेहा कक्करला पडली भुरळ! संजू राठोडचं केलं कौतुक, म्हणाली…

जुईली यावर म्हणाली, “आम्ही एकत्र तीन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिलो. लग्नाचं ठरल्यावर आम्हाला बाबांनी विचारलं की, तुम्ही अजून किती वर्ष घेणार आहात तर, आम्ही त्यांना आम्हाला पूर्णपणे सेट व्हायला तीन वर्षे तरी लागतील असं सांगितलं होतं. त्यामुळे या काळात तुम्ही कोणीही लग्नाचा विचार करू नका आम्हाला आमचा वेळ घेऊदेत असं आम्ही घरी सांगितलं होतं. जर त्या ३ वर्षात आम्ही नीट नाही वागलो तर निश्चितच आम्हाला बोला आम्ही तेव्हा सगळं ऐकून घेऊ.”

हेही वाचा : २ वर्षे डेट केल्यावर आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचं ब्रेकअप? जवळच्या मित्रानेच केला खुलासा

जुईली पुढे म्हणाली, “आम्ही लिव्ह इनमध्ये राहिलो यात सर्वात मोठा वाटा आमच्या आई-बाबांचा होता. त्यांनी खूप साथ दिली. कारण, आमच्या आई-बाबांनी खूप मोठा विचार केला. जर, त्यांनी आमची मतं, विचार समजून घेतले नसते, तर कदाचित आज आम्ही एवढे आनंदी राहू शकलो नसतो. रोहितच्या बाबांनी, माझ्या आई-बाबांनी खरंच आम्हाला खूप समजून घेतलं, पाठिंबा दिला. लॉकडाऊन लागल्यावर आम्ही एकमेकांची कशी काळजी घेतो, कसे भांडतो हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे असा विचार आमच्या कुटुंबीयांनी केला. साधारणत: पालक आपल्या मुलांना फक्त २-३ तासांसाठी पार्टनरला भेटायला बाहेर सोडतात पण, त्या काळात आपल्याला संबंधित व्यक्ती पूर्णपणे ओळखता येत नाही. यापेक्षा २४ तास एकत्र राहिल्यावरच या गोष्टी कळतात.”

हेही वाचा : Video : आलियाची लाडकी लेक पहिल्यांदाच काकाबरोबर फिरताना दिसली…; राहा कपूरचे हावभाव पाहून नेटकरी म्हणाले…

“तुम्ही ६ महिने एकत्र राहिलात आणि पुढे जाऊन गोष्टी जुळून आल्या नाहीतर तो त्रास फक्त दोन व्यक्तींना होतो. एकतर तुम्हाला आणि पार्टनरला…पुढे, आपण आपआपल्या मार्गी लागतो. पण, लग्न झाल्यावर असं नसतं. नंतर पटलं नाहीतर दोन कुटुंब एकत्र आलेली असतात मग, सगळ्यांनाच दु:ख होतं. त्यामुळे जोडीदाराची निवड खूप विचारपूर्वक करावी आणि या गोष्टी लग्नाआधीच कराव्यात. लग्नाआधीच एकमेकांना समजून घ्यावं. त्यामुळे घाईत लग्न करण्यापेक्षा एका अशा व्यक्तीबरोबर लग्न करा ज्याच्याबरोबर तुम्ही कायम सुखी असाल.” असं रोहित राऊतने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit raut and juilee joglekar talks about live in relationship sva 00