व. पु. काळे ज्या काळात लिहिते होते तेव्हाचा काळ हा सुशेगात, निवांतपण असण्याचा होता. आसमंतात घाईगर्दी, महत्त्वाकांक्षा, प्रगतीची दौड वगैरे गोष्टी फार नव्हत्या. मध्यमवर्गीय जगणं, नीतिमूल्यं आणि आदर्शवादी विचारांचा पगडा सर्वसामान्यपणे लोकांच्या जीवनाचा भाग होता. त्यातही आपले बहुतांश लेखक मध्यमवर्गीयांतूनच आलेले असल्याने साहित्यात त्यांचं जगणं प्राधान्याने केंद्रस्थानी असणं स्वाभाविक होतं. त्यामुुळे या लेखकांकडून आपल्या जगण्यापल्याडच्या गोष्टी साहित्यात येणं बहुश: अवघडच होतं. आपण जे जगतो तेच साहित्यातून मांडण्याची उपजत प्रवृत्ती माणसांत असते, त्याला ते धरूनच होतं. यापल्याडचं जग धुंडाळायचं तर काहीएक वेगळी दृष्टी, अनवट प्रतिभा आणि समाजातील आगळ्यावेगळ्या गोष्टींचं, घटना-प्रसंगांचं आकलन करून घेण्याची असोशी जरुरीची असते. ती फारच थोड्या लेखकांमध्ये असते. अर्थात यामुळे या मध्यमवर्गीय लेखकांना कमी लेखण्याचं काहीएक कारण नाही. समाजाला आरसा दाखवण्याचं काम तेही करीत असतात. असो. याच मध्यमवर्गीय जाणिवांना आपल्या साहित्यातून आविष्कृत करणारे एक लोकप्रिय लेखक म्हणजे व. पु. काळे! पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे हे आजही ‘लोकप्रिय’ या कॅटेगरीतले लेखक मानले जातात. त्यांचं लिखाण मध्यमवर्गीयांना भावतं… आवडतं. याचं कारण काळ आणि जीवनाची गती कितीही बदलली, व्यक्तिवादानं आपल्याला आज कह्यात घेतलेलं असलं तरीही आपल्या अंतर्मनात जुन्या मूल्यांबद्दल, नैतिकतेबद्दलची आपली ओढ अजूनही मृत झालेली नाही, हेच असावं. असो.
तर… व. पुं.चं साहित्य आणि त्यांचं जीवन यावर आधारित ‘११ वपुर्झा’ हा कार्यक्रम नुकताच रंगमंचावर सादर केला गेला आहे. व. पुं.च्या कन्या स्वाती चांदोरकर-काळे यांनी तो मंचित केला आहे. आणि अभिनेते सुनील बर्वे आणि शशांक केतकर यांचा त्यात सहभाग आहे.
व. पुं.चं लेखन, त्यांचं कार्यकर्तृत्व आणि जीवन लोकांसमोर मांडावं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे आणि तो बऱ्याच अंशी साध्य झाला आहे.
व. पु. काळेंचं जीवन हे एकीकडे निवेदनातून उलगडत असतानाच त्यांचा पत्रव्यवहार, कथा यांच्या सादरीकरणातून कार्यक्रम पुढे पुढे सरकत जातो. व. पुं.ची कन्या कार्यक्रम सादर करत असूनही त्यांच्यावर केली गेलेली टीका, त्यांच्या लेखनावर घेतले गेलेले आक्षेप यात त्यांनी वगळलेले नाहीत, हे विशेष. किंबहुना त्यास यात ठळक स्थान दिलं गेलेलं आहे. व. पुं.चं बालपण, त्यांचं मोठं होणं, नेपथ्यकार वडील पु. श्री. काळेंचा समृद्ध वारसा, विविध कलांमधील त्यांची रुची, त्यातील त्यांचं कौशल्य, आर्किटेक्ट म्हणून त्यांचं महापालिकेतील कार्य, कथालेखनाची सुरुवात आणि त्यात होत गेलेली प्रगती, कथाकथनाचे लोकप्रिय कार्यक्रम, रसिकांचा त्यांना मिळालेला भरभरून प्रतिसाद, घरगुती व. पु., त्यांच्या वृत्तीतली उदारमनस्कता, माणसांचं लोभीपण, हळवा स्वभाव, वाचकांप्रतीची बांधीलकी, त्यांच्या तिरकस वा भाबड्या प्रेमाला त्यांनी दिलेला दिलखुलास प्रतिसाद… त्यांच्या कथांतील नमुनेदार किस्से, त्यांतली चमत्कृतीपूर्ण माणसं, जीवनाप्रतीचा त्यांचा दृष्टिकोन… अशा व. पुं.च्या सगळ्या अंगांना स्पर्श करत कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातो. व. पु. एक व्यक्ती आणि लेखक, कथाकथनकार म्हणून आपल्यासमोर सहजी उलगडत जातात.
स्वाती चांदोरकर-काळे यांनी ‘सांगे वडिलांची कीर्ती’ धर्तीचा हा कार्यक्रम संहिताकार म्हणून छान बांधला आहे. परंतु त्यांनी त्याच्या मंचीय सादरीकरणाचा फार विचार केलेला जाणवत नाही. त्या स्वत: यात निवेदक म्हणून वावरतात. परंतु त्यांचं मधूनच निर्गमन प्रश्नांकित करतं. त्याने रसभंग होतो. मात्र, सुनील बर्वे आणि शशांक केतकर व. पुं.ची पत्रोत्तरे आणि त्यांच्या कथा उत्तमरीत्या सादर करतात. त्यात अभिवाचनाचा पोत अभिप्रेत आहे आणि तो तसाच रंगतदार पद्धतीने आविष्कारित होतो. व. पुं.ना आलेली पत्रे आणि त्यांनी त्यांना दिलेली उत्तरं त्यांचं एक व्यक्ती आणि लेखक म्हणून उत्कट व्यक्तिमत्त्व उभं करतात. त्यांचं घरगुती वागणं त्याच्या खुल्या, भावदर्शी मनाची साक्ष देतात. व. पुं.ची जडणघडण, त्यांचा माणूस आणि लेखक म्हणून झालेला विकास यात समग्रपणे आला आहे. त्यांच्या पत्रापत्रीतून ते जसे लेखक म्हणून व्यक्त होतात, तशीच त्यांची माणूस म्हणून असलेली जीवनधारणाही व्यक्त होते.
कार्यक्रम कुठंही रेंगाळत नाही वा कंटाळवाणाही होत नाही. नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी व. पुं.ची छायाचित्रं, त्यांची बोधपर वाक्यं, पुस्तकांची मुखपृष्ठं यांतून प्रसन्न बॅकड्रॉप उभा केला आहे. अक्षय सावंत यांनी प्रकाशयोजनेतून आणि प्रबोध शेट्ये यांनी संगीतातून व. पुं.च्या कथांतील नाट्य उठावदार केलं आहे. रंगभूषेची जबाबदारी राजेश परब यांनी सांभाळली आहे.
स्वाती चांदोरकर-काळे यांनी आपले वडील आणि लेखक व. पु. काळे यांचं व्यक्तिमत्त्व आपल्या प्रवाही निवेदनातून साकारलं आहे. त्यांनी सांगितलेले किस्से आणि घटना रोचक आहेत. त्या श्रोत्यांना बांधून ठेवतात. पण कार्यक्रमात मध्यातच त्यांचं मंचावरून निघून जाणं रसभंग करतं. यावर त्यांनी काहीतरी तोडगा काढायला हवा. सुनील बर्वे आणि शशांक केतकर यांनी व. पुं.चा पत्रव्यवहार जिवंत केला आहे. त्यांतलं भावदर्शन श्रोत्यांना हलवून सोडतं. तीच गोष्ट त्यांच्या ‘भांडणारा जोशी’ आणि ‘हसरं दु:ख’ या कथांच्या अभिवाचनाची. त्यांतल्या भावभावना, त्यांतले पेच, उत्कटता श्रोत्यांच्या काळजाला भिडते. ही या कथांची बलस्थानं तर आहेतच, पण या दोन कलावंतांच्या सादरीकरणातला खुमासदारपणाही त्यास कारणीभूत आहे. एकुणात ‘११ वपुर्झा’ व. पुं.च्या लेखणी आणि जगण्याचं प्रत्ययकारी दर्शन घडवतो, हे नक्की.