ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ‘वंटास’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातलं “टिपूर टिपूर….” हे गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं असून, ४ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुरूकृपा प्रॉडक्शन एंटरटेन्मेंटच्या अमोल बापूराव लवटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वर यादवराव उमक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. गौरी आणि आंब्याच्या प्रेमकहाणीभोवती ‘वंटास’चं कथानक फिरतं. दिवसभर उनाडक्या करणारा आंब्या गौरीच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडल्यानंतर गौरीचं मन जिंकण्यासाठी त्याला काय काय करामती कराव्या लागतात, याचं सुरेख चित्रण ‘वंटास’मध्ये करण्यात आलं आहे. अजय वरपे, स्नेहल साळुंखे, अक्षय माहूलकर, रमेश वेदपाठक, मृणालिनी रानावरे , मनमोहन माहिमकर, प्रदीप नवले हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. सुदर्शन महामुनी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लेखन केलं आहे. हरीश राऊत आणि ज्ञानेश्वर उमक यांनी पटकथा लिहिली आहे. वलय आणि सुदर्शन महामुनी यांनी लिहिलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. शैलेश जाधव यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिलं. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून ग्रामीण प्रेमकहाणीचा सुरेख दरवळ अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.
वाचा : ‘त्याचे अश्रू खूप काही सांगून गेले’, अलीला पाहून कपिल ढसाढसा रडला
‘वेगळ्या पद्धतीनं ग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा “वंटास” या चित्रपटातून मांडली आहे. चित्रपट निर्मितीचा आमचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न आणि चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,’ अशी अपेक्षा अमोल बापूराव लवटे यांनी व्यक्त केली आहे.