‘मिर्झापूर’ या वेब सीरिजच्या वादाप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून वेब सीरिजचा कार्यकारी निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांना दिलासा मिळाला आहे. या दोघांच्याही अटकेवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसंच एफआयआर दाखल करणारे आणि राज्य सरकार यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या सीरिजमुळे ‘मिर्झापूर’ची प्रतिमा मलीन होते असं म्हणत फरहान आणि रितेशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यामुळेच हा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी या दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
१७ जानेवारी रोजी मिर्झापूरच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या सीरिजच्या माध्यमातून मिर्झापूरची प्रतिमा मलीन करण्यात येत आहे. तसंच धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत स्थानिक पोलीस ठाण्यात मिर्झापूरच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यामुळेच हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर झालेल्या सुनावीत उच्च न्यायालयाने निर्मात्यांच्या अटकेवर स्थिगिती दिली आहे.
पाहा : अभिनयातून जपला स्त्रीचा वसा; ‘या’ अभिनेत्यांनी साकारली स्त्री भूमिका
‘मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा मुख्य भूमिकेत झळकले आहेत. कालीन भैय्या, मुन्ना भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यातील जबरदस्त टक्कर या सीजनमध्ये दाखण्यात आली आहे. उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आलं आहे. मात्र, आता ही सीरिज अडचणीत सापडली आहे.