दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागाचैतन्य हे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. दरम्यान यानंतर नागार्जुनने त्या दोघांमध्ये नक्की काय झालं होतं याचा खुलासा केला होता. घटस्फोटासाठी सगळ्यात आधी समांथाने याची याचिका केली होती, असे नागार्जुनने सांगितले होते. पण नुकतंच नागार्जुनने हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले आहे. नागार्जुनने या मीडिया रिपोर्ट्सवर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. मी कोणत्याही मुलाखतीत यावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे हे वृत्त निराधार आहे, असे नागार्जुनने सांगितले. त्यासोबत नागार्जुनने ट्विटरवर पोस्ट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे. समांथा आणि नागाचैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या विधानाचा हवाला देऊन प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. ते सर्व वृत्त निराधार आहे. मी माझ्या मीडिया मित्रांना विनंती करतो की अशा अफवा बातम्या म्हणून पसरवू नये, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी या पोस्टसोबत #GiveNewsNotRumours हॅशटॅग वापरला आहे. नेमकं प्रकरण काय? समांथा आणि नागाचैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने प्रतिक्रिया दिली होती. इंडियाग्लिट्झने दिलेल्या वृत्तानुसार, "नागार्जुनने सांगितले की सगळ्यात आधी समांथाने घटस्फोटाची याचिका केली होती. तर नागा चैतन्यने तिचा निर्णय स्विकारला, पण त्याला माझी चिंता होती, मी काय विचार करणे आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे काय होणार. नागा चैतन्यने माझे सांत्वन केले कारण त्याला वाटलं की मला खूप चिंता असेल." समांथा आणि नागा चैतन्यमध्ये घटस्फोटासाठी कोणी घेतला पुढाकार, नागार्जुनने केला खुलासा "दोघेही वैवाहिक जीवनात ४ वर्षे एकत्र होते पण त्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद नव्हते. दोघे खूप जवळ होते आणि मला माहित नाही की त्यांनी हा निर्णय कसा घेतला. त्यांनी २०२१ चे नवीन वर्ष देखील एकत्र साजरे केले होते, त्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले असतील," असेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान हे वृत्त व्हायरल झाले होते. मात्र हे वृत्त खोट असल्याचे स्पष्टीकरण नागार्जुन यांनी दिले आहे.