‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने कलाविश्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. झायराने सोशल मीडियावर रविवारी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘कलाविश्वात जरी माझी प्रगती होत असली, जरी मी इथे योग्य वाटत असले तरी मी खूश नाही. हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं तिने म्हटलं. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी झायराला पाठिंबा दिला आहे.
‘झायराच्या निर्णयावर किंवा तिने केलेल्या निवडीवर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? आपल्या इच्छेनुसार जगण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. तिने जो काही निर्णय घेतला आहे त्याने ती आनंदी असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,’ असं ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.
Who are any of us to question @ZairaWasimmm’s choices? It’s her life to do with as she pleases. All I will do is wish her well & hope that what ever she does makes her happy.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 30, 2019
वाचा : धक्कादायक! ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमची बॉलिवूडमधून एक्झिट
२०१६ मध्ये झायराने ‘दंगल’ या चित्रपटातून पदार्पण केलं. कलाविश्वातील पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर ती हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. ‘दंगल’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी तिचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्याचा आला होता. बॉलिवूडमधील करिअर सुरळीत सुरू असतानाही तिने अचानक असा निर्णय का घेतला हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर सोशल मीडियावरील पोस्टमध्ये धार्मिक कारणे दिल्याने अनेकांनी तिच्यावर दबाव असल्याचीही चिंता व्यक्त केली आहे.