महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला रांगडा मर्द म्हणून हार्दिक जोशीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत साकारलेली राणादाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करुन आहे. अभिनेता हार्दिक जोशी याच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. त्यामुळे हार्दिकला ओळख मिळाली. आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत तो एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. सध्या ही मालिका चर्चेत आहे. या चर्चा मालिकेच्या सेटवर काही काळ बिबट्याचा वावर होता असे म्हटले जात असल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचं चित्रीकरण सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. या मालिकेचं चित्रीकरण सुरु होण्याआधी काही काळ सेटवर बिबट्याचा वावर होता असे म्हटले जात आहे. हा बिबट्या तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याच्या चर्चा आहेत. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच यावर मालिकेत एक सीन पण शूट करण्यात आला आहे, ज्यात सिद्धार्थ अदितीचं बिबट्यापासून रक्षण करतो. हा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे खरच बिबट्या आला होता की चित्रीकरणाचा भाग होता हे स्पष्ट झालेले नाही.
आणखी वाचा : अचानक एक गाडी समोरुन आली अन्…; ‘पाहिले न मी तुला’ फेम अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

झी मराठीवर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. त्यामुळे त्यातील सगळीच पात्र प्रेक्षकांना भावत आहेत.