‘बॉलीवूड’मध्ये नवा चित्रपट येऊ घातला की, प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीला चेव चढतो. ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा सततचा मारा संपल्यानंतर आता एकता कपूरच्या १५ ऑगस्टला येऊ घातलेला ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटाची हवा निर्माण झाली आहे. चित्रपट कसाही असला तरी त्याचे प्रमोशन दणक्यात करण्याची सध्या अहमहमिका लागली आहे. याच पोटी एकताने एका चॅनेलवरच्या एका तासाला चक्क दीड कोटी रुपये मोजले आहेत.
हा चित्रपट मार्केटिंगच्या गणितामध्ये कुठेही आपटू नये, यासाठी एकताने सारी सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
एकताचे सध्या लक्ष्य मात्र छोटा पडदा आहे. छोटय़ा पडद्यावर आतापर्यंत प्रमोशनच्या माध्यमातून सर्वात जास्त रक्कम मोजणारी एकता पहिल्या क्रमांवर आहे. छोटय़ा पडद्यावरील काही ठराविक कार्यक्रमांसाठी तिने संबंधित चॅनेल म्हणेल त्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम देऊ केली आहे. नुकतेच तिने एका वाहिनीवरील एक तासांचा वेळ तब्बल दीड कोटी रुपयांना विकत घेतल्याचे बोलले जाते. कुठल्या कार्यक्रमाचा टीआरपी किती आहे, या सर्वाचा अभ्यास करुन एकताने कार्यक्रमांची यादी तयार करून त्यानुसार पैसे मोजले आहेत. अक्षय, सोनाक्षी आणि इमरान कुठे प्रमोशनला जातील आणि काय बोलतील, हेही तिने निश्चित केले आहे. याशिवाय रेडिओ किंवा लाइव्ह प्रमोशनकरता चित्रपटाच्या नावाचे टी शर्टस् कलाकारांनी घालून जायचे, असे फर्मानही तिने सोडले आहे.  
एकताचा हा प्रमोशनल फंडा खरंतर नवीन नाही. परंतु ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा’ हा चित्रपट तिच्यासाठी अहंकाराचा मुद्दाही बनला आहे. हा चित्रपट ‘चेन्नई एक्स्प्रेस’बरोबर प्रसारित होऊ नये, याकरिता शाहरूखने जितेंद्रकडे मनधरणी केली होती. ही मागणी पूर्णही झाली. त्यामुळे आता एकताने स्वत: या चित्रपटासंदर्भातील पूर्वीचे ठरलेले सर्व नियोजन ऐनवेळी बदलून नव्याने मार्केटिंगला सुरुवात केली आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’इतका नसला तरी त्याच्या तोडीस तोड खर्च तिने केल्याची कुजबुज ऐकायला मिळते. ‘रागिनी एमएमएस’च्या वेळीही तिने हीच पद्धत वापरली होती.