बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लवकरच चित्रपट ‘बंटी और बबली’च्या सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील सुरू आहे. पण सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेला सैफ एका कार्यक्रमात असं काही बोलला की सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

सैफ अली खान आणि ‘बंटी और बबली २’ चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच या संपूर्ण टीमनं लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. ज्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून यातील सैफ अली खानच्या एका वाक्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या शोमध्ये कपिल शर्माच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सैफनं ‘मी जास्त काळ घरी राहिलो तर माझ्या मुलांची संख्या वाढेल’ असं वक्तव्य केलं आहे. सैफ अली खान आणि कपिल शर्मा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Aarya 2 Teaser: शेरनी परत येतय! सुष्मिता सेनचा खतरनाक लूक चर्चेत

मागच्या काही काळात सैफ अली खानचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. मागच्या काही काळात सैफ ‘तांडव’ वेब सीरिज आणि ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसला त्यानंतर आता लवकरच तो ‘बंटी और बबली २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याकडे लक्ष वेधत कपिल शर्मानं त्याच्या शोमध्ये हजेरी लावलेल्या सैफला सतत कामात व्यग्र राहण्याचं कारण विचारलं. ‘तुला आधीपासूनच असं कामात व्यग्र राहायला आवडतं की तू तुझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कुटुंब वाढल्यामुळे जास्त काम करत आहेस?’ असा मजेदार प्रश्न यावेळी कपिल शर्मानं विचारला.

कपिल शर्माच्या प्रश्नाचं उत्तर देताना सैफनं असं काही वक्तव्य केलं की सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तो म्हणाला, ‘मी स्वतःला यासाठी कामात व्यग्र ठेवतोय कारण मला भीती वाटते की मी घरी राहिलो तर माझ्या मुलांची संख्या वाढेल.’ सैफचं हे मजेदार उत्तर ऐकताच सर्वांनाच हसू आवरेनासं झालं. त्याचा हा व्हिडीओ धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बंटी और बबली’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता आणि तो सुपरहीटही ठरला होता. आता याच चित्रपटाचा सीक्वेल म्हणजेच ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत गली बॉय फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री शर्वरी वाघ या चित्रपटतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.