दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री समांथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा समांथाने सोशल मीडियावरुन पतीचे आडनाव हटवल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आता समांथाने यासर्व चर्चांवर वक्तव्य करत पूर्णविराम दिला आहे.

समांथाने नुकताच प्रश्न आणि उत्तर या फिचरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा एका चाहत्याने तिला ‘तू खरच मुंबईत रहायला जाणार आहेस का?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर समांथाने ‘मला माहिती नाही या अफवा कशा सुरु झाल्या. पण हे सत्य नाही. हैदराबाद हे माझे घर आहे. हैदराबादने मला सर्व काही दिले आहे आणि मी इथे राहण्यात आनंदी आहे’ असे उत्तर दिले.

समांथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते दोघे वेगळे राहत असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण समांथाने या सर्व चर्चांवर वक्तव्य करणे टाळले आहे. २००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले.