दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस. त्याने आजवर अनेक चित्रपट केले आहेत. समीर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकताच केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये त्याने प्रेक्षकांना विनंती केली आहे.

समीरने ट्वीट करत प्रेक्षकांना चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जावून चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. ‘गेलं दीड वर्षे सगळ्यांसाठीच आर्थिक गणित कोलमडून टाकणारं गेलंय, अजूनही जातंय. मनोरंजन क्षेत्रही यातून सुटलं नाही. लाखो कुटुंब पोळली गेली, काही अजूनही झगडतायत. करोडोची गुंतवणूक २ वर्षे अडकून आहे. त्यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे आणि आत्ता कुठे गाडी यार्डातून बाहेर येत आहे. पण ती नीट रुळावर आणणं पूर्णपणे आता प्रेक्षकांच्या हातात आहे. एकीकडे हिंदीचे १५० कोटी पार आकडे बघताना मनापासून वाटतं की असाच भरघोस हाऊसफूल प्रतिसाद मराठी चित्रपटांनाही मिळावा! ते चित्र बघायला आणि अनुभव घ्यायला आम्ही सर्व कलाकार मंडळी आसूसलोय!’ असे समीरने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

पुढे त्याने, ‘खरंच! पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मराठी चित्रपटही प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन पाहतील. तसं घडलं तर ते तुफान हाऊसफूल दिवस दूर नाहीत. खरच सांगतो आमच्या कलाकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की येणारे मराठी चित्रपट शक्य तितके चित्रपटगृहात जाऊनच बघा. नाही आवडले तर तसं मोकळेपणाने सांगाच, तो तुमचा हक्कंच आहे. पण तुम्ही जर भरभरुन प्रतिसाद दिलात तर आणि तरच आपली मराठी चित्रपटसृष्टी परत एकदा हळूहळू रांगायला.. चालायला आणि मग धावायला लागेल. याच बरोबर राज्यसरकारलाही विनंती आहे. बाकी सगळं अगदी नीट व्यवस्थीत सुरु झालंय तर मग चित्रपट आणि नाट्यगृहही पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरु करण्यात यावीत.’

समीरचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. हे ट्वीट करत त्याने, ‘हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून.. सगळ्यांच्यावतीने.. सगळ्यांसाठी..’ असे कॅप्शन दिले आहे.