लंडन येथील ‘पीकॉक थिएटर’मध्ये ९ ऑक्टोबरला खास प्रयोग

१०० वर्षांचे नाटय़गृह आणि १०० वा नाटय़प्रयोग पाहण्याचा ऐतिहासिक दुग्धशर्करा योग अभिनेता, निर्माता प्रशांत दामले यांनी नाटय़रसिकांसाठी जुळवून आणला आहे. १०५ वर्षे गाठलेल्या लंडनमधील ‘पीकॉक थिएटर’मध्ये ९ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता ‘संगीत संशयकल्लोळ’च्या  शताब्दीनिमित्त खास प्रयोग सादर करण्यात येणार आहे , अशी माहिती प्रशांत दामले यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना दिली.

लंडनमधील ‘ट्रॅफलगार स्क्वेअर’ ही जागा म्हणजे जगभरातील नाटय़-चित्रपट संस्कृतीची ओळख करून देणारे ठिकाण असे म्हटले जाते. ३० ते ३५ नाटय़गृहांना घेऊन डौलदारपणे उभ्या असलेल्या या जागेत अनेक जुनी नाटय़गृहे आहेत. १९११ साली नव्या दिमाखाने इथे उभे राहिलेले ‘पीकॉक थिएटर’ आणि १९१६ साली आपल्याकडे नव्याने गाण्यांचा साज लेवून आलेले नाटककार कै. गो. ब. देवल लिखित ‘संगीत संशयकल्लोळ’ हे जुने नाटक या दोन ऐतिहासिक गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘संगीत संशयकल्लोळ’च्या शताब्दी वर्षांनिमित्ताने हे नाटक पुन्हा एकदा व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य प्रशांत दामले यांनी उचलले. आता या नाटकाचा खास प्रयोग लंडनमधील शंभर वर्षांपेक्षा जुन्या नाटय़गृहात दाखवण्यात येणार आहे. ‘ट्रॅफलगार स्क्वेअर’ ही जागाच अशी आहे की, तिथे लोक  फक्त वेगवेगळे नाटक पाहण्यासाठी जातात. अशा ठिकाणी आत्तापर्यंत हजारो प्रयोग झालेले मराठमोळे आणि एक ऐतिहासिक नाटय़परंपरा असलेले नाटक पाहिले जावे, असा विचार मनात आला.

तिथल्या मराठी मंडळाच्या मदतीने हे शक्य झाले असून ९ ऑक्टोबरला ‘पीकॉक थिएटर’मध्ये दुपारी दीड वाजता ‘संगीत संशयकल्लोळ’चा प्रयोग रंगणार आहे, अशी माहिती प्रशांत दामले यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना दिली.

शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या नाटय़गृहात देवलांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले जुने नाटक पाहायला मिळणे हा खरे तर दुर्मीळ योग आहे, पण तो जुळून आल्याबद्दल आपल्याला आनंद झाला असल्याचे दामले यांनी सांगितले.

देवलांचे हे नाटक तसे शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. १८९३ साली हे नाटक पहिल्यांदा गद्य रूपात लिहिले गेले होते. त्या वेळी त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग जेव्हा ‘संगीत सौभद्र’सारखे संगीत नाटक हिट झाले तेव्हा देवलांनी पुन्हा एकदा ‘संगीत संशयकल्लोळ’ रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला.

पहिल्यांदा गद्य रूपात आलेले हे नाटक संगीत नाटक म्हणून रंगभूमीवर आले तेव्हा त्यात तब्बल तीसेक गाणी होती. एकटय़ा अश्विनशेठ यांच्या वाटय़ाला दहा गाणी होती. मग रेवती या पात्रासाठी दहा गाणी अशा तीस गाण्यांना घेऊन हे नाटक लोकांसमोर आले.

तेव्हा रात्ररात्रभर नाटक  चालत असल्याने तीस गाण्यांचे हे नाटकही त्या वेळी लोकांना खूप आवडले. तेव्हापासून आज शंभर वर्षांत हजारो प्रयोग होऊनही लोकांच्या मनावरची

‘संगीत संशयकल्लोळ’ची जादू ओसरलेली नाही, असे दामले यांनी सांगितले. या नाटकाला इथे जसा प्रतिसाद मिळतो आहे तसाच तो लंडनमध्येही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या नाटकाची तिकीटविक्रीही सुरू झाली असून  संकेतस्थळावर लंडनमधील नाटय़प्रयोगाची तिकिटे उपलब्ध असल्याची माहिती दामले यांनी दिली.