वादग्रस्त ट्विट करुन रोष ओढावून घेणारे गायक अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रगीत लावण्याच्या मुद्द्यावरुन अभिजीत यांनी मत मांडले आहे. राष्ट्रगीतावेळी उभे न राहणा-यांना कारगिलला पाठवा असे मत अभिजीत यांनी मांडले आहे.
केरळमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहा जणांना राष्ट्रगीतावेळी उभे न राहिल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या कारवाईवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मंगळवारी गायक अभिजीत यांनीदेखील या वादात उडी घेतली. अभिजीत यांनी ट्विटरवर पीटीआयची बातमी शेअर करत त्यावर स्वतःचे मत मांडले. पीटीआयचे ट्विट शेअर करताना अभिजीत म्हणाले, ‘त्यांना कारगिलला पाठवा, -५० डिग्री वातावरणात त्यांना सोडा. जयहिंद.’ कारगिलमधील थंड वातावरणात या लोकांना अद्दल घडेल असे बहुधा अभिजीत यांना सुचवायचे होते.
https://twitter.com/abhijeetsinger/status/808526870207565824
गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रगीत सुरु असताना सर्वांनी उभे राहणे गरजेचे असल्याचे कोर्टाच्या आदेशात म्हटले होते. विकलांग आणि गतिमंद मंडळींना हा नियम लागू नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे एकीकडे चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावणे बंधनकारक करतानाच सुप्रीम कोर्टाने देशभरातील न्यायालयांमध्ये सुनावणीपूर्वी राष्ट्रगीत लावण्यास नकार दिला होता.
आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. रविवारी चेन्नईतल्या एका चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहणाऱ्या तीन जणांना मारहाण करण्यात आली होती. १५ ते २० जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली होती. पीडितांमध्ये महिलांचाही समावेश होता. तर दुसरी घटना केरळमध्ये घडली होती.
गायक अभिजीतने वादग्रस्त ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ट्विटरवर बेताल विधान करुन अभिजीत वादाच्या भोव-यात अडकला होता.