मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गाण्यांना आवाज देत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. हल्ली गायकांची वाढती संख्या आणि आजच्या काळात चालणाऱ्या गाण्यांची गर्दी पाहता सुरेश वाडकर आणि त्यांच्यासारखे इतर गायकही काहीसे पडद्याआड गेले आहेत.
‘चला हवा येउ द्या’ या कार्यक्रमात विनोदाची चौफेर फटकेबाजी तर नेहमीच सुरु असते. या वेळी ‘कान्हा’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी संपूर्ण टीमसह, गायक सुरेश वाडकर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान या कार्यक्रमामध्ये सुरेश वाडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीविषयी बोलताना ‘आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्रगल करावा लागत आहे,’ असे वक्तव्य केले. १९७६ च्या दरम्यान सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. याबाबत बोलताना ‘संगीत दिग्दर्शनातील त्या काळातील परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये फारच फरक पडला असून मला आजच्या काळातच जास्त स्ट्रगल करावा लागत आहे’ अशी खंत व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्यासाठी सुरेश वाडकर रेल्वेने मीरारोड येथील सेटवर पोहोचले होते. या रेल्वे प्रवासाविषयी सांगताना, काही प्रवाशांना त्यांच्या परिस्थितीविषयी शंका आली, अशा आशयाची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
दहीहंडीच्या खेळातली निरागसता संपली ती राजकारण्यांनी प्रत्येक थराभोवती पैसे वाटायला सुरुवात केल्यानंतर. आज त्या दहीहंडीला एक मोठं ग्लॅमर आलं आहे, मात्र त्या ग्लॅमरमध्ये हा सणही हरवला आहे आणि खेळही हरवला आहे. चोरपावलांनी या खेळात शिरलेल्या राजकारणाने ‘दहीहंडी’चा रंगच बदलून टाकला. हा बदलत गेलेला रंग आणि त्यात हरवलेले गोविंदा याचे चित्रण ‘कान्हा’त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2016 रोजी प्रकाशित
मी सध्या ‘स्ट्रगल’ करत आहे- सुरेश वाडकर
कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्यासाठी सुरेश वाडकरांनी केला रेल्वे प्रवास
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-08-2016 at 17:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer suresh wadkar talking about his experience in industry