दिग्दर्शक अनुराग कश्यप कायमच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. गेले काही दिवस माध्यमांपासून थोडा दूर असलेला अनुराग ‘दोबारा’ या त्याच्या सध्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने बोलताना सध्या हिंदी चित्रपटांना मिळणारे अपयश, धर्मा-यशराजसारख्या मोठमोठया निर्मिती संस्थांची तिकीटबारीवरची नामुष्की या विषयांवर रोखठोक मतं त्याने व्यक्त केली आहेत. बॉलीवूडची ‘स्टार’ व्यवस्था मला कधीच आवडली नाही, असं सांगताना स्टार कलाकाराभोवती चित्रपट गुंफण्याची प्रथाच बंद करायला हवी, असं तो म्हणतो.

‘मला मुळातच या स्टार व्यवस्थेचा तिटकारा आहे. बाहेर हॉलीवूडमध्ये माव्र्हलसारखे स्टुडिओ फारसे लोकप्रिय नसलेल्या चरित्र अभिनेत्यांना घेऊन त्यांना संधी देतात. ‘टायटॅनिक’ चित्रपट आला तेव्हा केट विन्स्लेट आणि लिओनार्दो द कॅप्रिओ हे तथाकथित व्यावसायिक चित्रपटांचे कलाकार नव्हते. तीच गोष्ट ‘अवतार’च्या बाबतीतही म्हणता येईल. आपल्याकडे बरोबर याच्या उलटं चित्र असतं,’ असं म्हणत त्याने बॉलीवूडच्या या स्टार कलाकारांनाच चित्रपटात घेण्याच्या अट्टहासावर टीका केली. ‘आपल्याकडे जितका मोठा चित्रपट तितका मोठा कलाकार’ हे समीकरण ठरलेलं आहे. त्यामुळे त्या चित्रपटावर इतकं दडपण असतं. त्यापेक्षा आपले चित्रपट खरोखरच प्रदर्शित झाल्यानंतर दरदिवशी किती कमाई करतात, याचे निरीक्षण करणारी एक समान व्यवस्था असायला हवी, असा मुद्दा त्याने मांडला.

axis mutual fund, axis multicap fund
अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Infrastructure and Real Estate Sector in Mumbai
मुंबईतील पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिकीटबारीवर ते किती कमाई करतात, किती चालतात, हे सांगणारी पारदर्शक व्यवस्था आपल्याकडे नाही. चित्रपटाच्या रोजच्या उत्पन्नाचे सारखे आकडे सांगणारी दोन माणसं तुम्ही कधी पाहिली आहेत का? कारण तशी व्यवस्थाच आपल्याकडे नाही. चित्रपटांचे उत्पन्न, त्यांचा खर्च याचा ताळेबंद मांडणारी एक समान व्यवस्था आपल्याकडे झाली तर चित्रपटांवर होणारा अनाठायी खर्च वाचेल. तो कमी करता येईल, असंही त्याने सांगितलं. चित्रपटात मोठा कलाकारच हवा, ही मागणी आणि त्या कलाकारानुसार सगळी व्यवस्था करताना वाढत जाणारा चित्रीकरणाचा खर्च यामुळे कशापद्धतीने नुकसान सहन करावे लागते, याबद्दल बोलताना त्याने त्याच्या सर्वाधिक अपयशी ठरलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. या चित्रपटात खरंतर रणवीर सिंगची निवड होणार होती. खुद्द ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वात रणवीरने आपल्याला कोणतंही कारण न देता चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्या वेळी रणवीर सिंग हा या चित्रपटाला यशस्वी करू शकणार नाही, त्याच्या जोरावर चित्रपट कमाई करणार नाही, असा सल्ला निर्मितीसंस्थेसह चित्रपट उद्योगात जाणकार म्हणवणाऱ्या काही लोकांनी दिला होता. आज तेच लोक रणवीरबरोबर चित्रपट करत आहेत, असंही त्याने सांगितलं.

‘यशराज’वरही टीका..
अनुरागच्या मते बॉलीवूड ज्या काही मोजक्या नामवंतांच्या हातात आहेत, त्यांची पुढची पिढी आज त्या त्या निर्मितीसंस्थांचे काम पाहते आहे. मात्र या पुढच्या पिढीतील जवळपास सगळेच लोक हे पड़द्यावरचा चित्रपट पाहून मोठे झाले आहेत. ते एका अतिशय आरामदायी, सुखद, बंदिस्त वातावरणात वावरलेले असल्याने त्यांनी वास्तव जग पाहिलेलेच नाही. आणि हे त्यांचे चित्रपट अयशस्वी ठरण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे, असं तो म्हणतो. या वर्षी ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘शमशेरा’सारखे यशराजचे मोठे चित्रपट आपटले. त्यामागची कारणमीमांसा करताना तो म्हणतो, यशराज स्टुडिओतील कर्त्यांनी ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ पाहिलेला असतो. त्याच्यासारखं काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या नादात ‘ठग्ज ऑफ हिंदूस्थान’ जन्माला येतो. जे पडद्यावर दिसलेलं नाही वा पाहिलेलं नाही ते चित्रपटात असूच शकत नाही, असा काहीसा त्यांचा समज असतो. उलट हा उद्योग असा आहे जिथे वेगवेगळय़ा स्तरातील लोक एकत्र येऊन काम करत असतात, पण ते लक्षात न घेता त्यांच्यावर ठरावीक पद्धतीने काम करण्याचं बंधन टाकलं जातं. त्यामुळे इथे जॉर्ज मिलरच्या ‘मॅड मॅक्स फरी’सारखं काहीतरी बनवायचा उद्देश असतो. तशी कथा तुम्ही निवडता, पण परिणामस्वरूप ‘शमशेरा’ तयार होतो. यशराजसारखे मोठे स्टुडिओ सध्याच्या कठीण काळात अशा चुका करू शकत नाहीत. करोनानंतर बिघडलेले व्यवसायाचे आर्थिक चक्र सुधारणं गरजेचं आहे. अशा वेळी तीन चित्रपटांचे अपयश परवडणारं नाही, असं अनुराग स्पष्ट करतो. केवळ या निर्मितीसंस्थांवरच नाही तर त्यांच्या कर्त्यांधत्र्यांवरही त्याने निशाणा साधला आहे. तुम्ही एका कार्यालयात बसून इतर लेखक-दिग्दर्शकांना हे अशा पद्धतीने करा, तसं करा.. अशा सूचना देत बसणं योग्य नाही. त्यापेक्षा नव्या लेखक-दिग्दर्शकांना संधी द्या, त्यांना त्यांच्या मनातील कथा पडद्यावर साकारण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, असंही तो सांगतो.
‘माव्र्हल’सारख्या मोठमोठय़ा हॉलीवूड स्टुडिओंचे अनुकरण करत छोटय़ा-मोठया संकल्पनांवरील चित्रपट मालिका करण्यातही त्याला रस नाही. त्यांचं अनुकरण करण्याच्या नादात आपले दिग्दर्शक आपली ओळख हरवून बसतील, अशी भीती अनुरागने व्यक्त केली. एकीकडे आदित्य चोप्रावर टीका करणारा अनुराग करण जोहरला मात्र प्रयोगशील दिग्दर्शक-निर्माता मानतो. करण जोहरबद्दल लोकांनी चुकीचे ग्रह करून घेतले आहेत, असं तो म्हणतो. मी करणबरोबर काम केलं आहे. तो स्वत:च स्वत:चा उत्तम टीकाकार आहे, असं अनुरागने सांगितलं. धर्मा प्रॉडक्शनचा सर्जनशील प्रमुख सोमेन मिश्रा हा करण जोहरचा सगळय़ात मोठा टीकाकार होता. करणने त्यालाच आपल्या संस्थेत पदावर घेतलं. तो खरोखरच द्रष्टा आणि धैर्यशील आहे, असं अनुराग म्हणतो. ‘दोबारा’च्या निमित्ताने बॉयकॉट ट्रेण्डपासून ऑस्करसाठी ‘द काश्मीर फाईल्स’ची निवड व्हायला नको.. इथपर्यंत अनेकविध मुद्दय़ांवर अनुरागने खास त्याच्या शैलीत दिलेली रोखठोक उत्तरं सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झाली आहेत.

आपल्याकडे जितका मोठा चित्रपट तितका मोठा कलाकार हे समीकरण ठरलेलं आहे. त्यामुळे त्या चित्रपटावर कमाईचं दडपण असतं. अर्थात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिकीटबारीवर ते किती कमाई करतात, किती चालतात, हे सांगणारी पारदर्शक व्यवस्था आपल्याकडे नाही. चित्रपटाच्या रोजच्या उत्पन्नाचे सारखे आकडे सांगणारी दोन माणसं तुम्ही कधी पाहिली आहेत का? चित्रपटांचे उत्पन्न, त्यांचा खर्च याचा ताळेबंद मांडणारी एक समान व्यवस्था आपल्याकडे झाली तर चित्रपटांवर होणारा अनाठायी खर्च वाचेल. तो कमी करता येईल. चित्रपटात मोठा कलाकारच हवा, ही मागणी आणि त्या कलाकारानुसार सगळी व्यवस्था करताना वाढत जाणारा चित्रीकरणाचा खर्च यामुळे नुकसान सहन करावे लागते.-अनुराग कश्यप