अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावू जाणाऱ्या अक्षय कुमारचे कलाविश्वामध्ये प्रत्येकासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे कोणत्याही कलाकारासोबत त्याचे वाद झाल्याचं ऐकिवात नाही किंबहुना तशा चर्चाही कधी चाहत्यांमध्ये रंगल्या नाहीत. परंतु सगळ्यांशी मैत्रीपूर्ण नातं जपणाऱ्या अक्षयचे एकेकाळी सनी देओलसोबत वाद झाले होते. विशेष म्हणजे या वादाला अभिनेत्री रविना टंडन कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर रविनामुळे सनीने अक्षयच्या कानशिलातही लगावली होती.

ट्विंकल खन्नासोबत लग्नगाठ बांधलेल्या अक्षयचं कधी काळी रविना टंडनवर प्रचंड प्रेम होतं. या दोघांनी जवळपास ३ वर्ष एकमेकांना डेट केलं. परंतु काही कारणास्तव या दोघांमध्ये दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर रविनाची झालेली अवस्था पाहून रागाच्या भरात सनीने अक्षयवर हात उचलला होता.

वाचा : Video : तुम्हाला माहितीये, रिंकू कसा निवडते चित्रपट ?

‘जोर’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना एकेदिवशी रविना सेटवर येऊन अचानकपणे रडू लागली. तिची ही अवस्था पाहून सनीने तिला रडण्याचं कारण विचारलं. त्यावर रविनाने अक्षयसोबत ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. रविनाच्या रडण्यामागचं खरं कारण समजल्यानंतर सनी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने अक्षयच्या कानशिलात लगावली.

वाचा : तारा सुतारियाच्या घरी वाजणार सनई-चौघडे; करीना होणार नणंदबाई?

दरम्यान, याप्रकारनंतर सनीच्या आणि रविनाच्या अफेअरच्याही चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु याविषयी दोघांनीही मौन बाळगणं पसंत केलं. सध्या रविना कलाविश्वापासून दूर आहे. तर अक्षय कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. विशेष म्हणजे सनी देओलचा देखील कलाविश्वातील वावर कमी झाला असून सध्या ते राजकारणामध्ये रममाण झाल्याचं दिसून येतं.