दोन वर्षांमागे तूरडाळ टंचाईने लोक संत्रस्त झाल्यामुळे मोदी सरकारने शेतकऱ्यांना तुरीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घ्यायला सांगितलं आणि तुरीला चांगला हमीभाव देण्याचं आश्वासनही दिलं. त्यानुसार शेतकऱ्यांनी तूरडाळीचं पीक घेतलं. पण सरकार दिल्या शब्दाला जागलं नाही. आधीच आयात तूरडाळीमुळे बाजारात तुरीचे भाव घसरले होते. तशात सरकारने हमीभाव आणि शेतकऱ्यांकडून सर्व तूरडाळ विकत घेण्याचं आश्वासनही पाळलं नाही. भरीस भर व्यापाऱ्यांनीच सरकारला तूरडाळ विकली. त्यामुळे शेतकऱ्यांची जास्तीची तूरडाळ विकत घ्यायला सरकारने नकार दिला. सरकारच्या आश्वासनावर मरमर मरून घेतलेलं पीक मातीमोल झालं. त्यात आणखीन नोटाबंदीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. अशाने त्यांना आत्मघातावाचून दुसरा मार्ग काय उरणार? कर्ज-परतफेडीची टांगती तलवार आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यानं दुसरं करावं तरी काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली कित्येक वर्षे शेतकरी अशाच प्रकारे अस्मानी सुलतानी, कर्जाचा वाढता डोंगर, बाजारपेठेची नागवणूक आणि त्याचा गळा घोटणारी सरकारी धोरणे यांना तोंड देता देता मेटाकुटीला आलेला आहे. शहरी ग्राहकांना मात्र शेतकऱ्याचा मुखवटा धारण केलेले धनदांडगे राजकारणी तेवढे दिसतात. त्यांच्यातच ते गरीब शेतकऱ्यालाही मोजतात आणि त्याच्या नावानं बोटं मोडतात. अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन मजूर हे मात्र त्यांच्या खिजगणतीत नसतात. सरकारलाही आपल्या तुंबडय़ा भरणारा शहरी विकासच दिसतो. आजही देशात ६० टक्क्यांहून अधिक लोक शेतीवर अवलंबून असताना त्यांना वाऱ्यावर सोडून विकासाच्या शहरी प्रारूपाचं डिंडिम बडवणाऱ्या आणि त्यातच मश्गुल असलेल्या ढोंगी नेत्यांची ही चाल आता शेतकऱ्यांना कळली आहे. पण गेंडय़ाच्या कातडीच्या व्यवस्थेशी टक्कर देण्याचं बळ त्याच्यात आता उरलेलं नाही. संपावरील शेतकऱ्यांना चर्चेच्या घोळात अडकवून कात्रजचा घाट दाखवणाऱ्या बनेल नेत्यांची सोंगं सरळमार्गी शेतकऱ्यांच्या ध्यानात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार मागील पानावरून पुढे सुरूच राहतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulat sulat marathi natak
First published on: 21-01-2018 at 01:56 IST