‘बालपण देगा देवा’ मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या दमदार अभिनयाने तसेच आनंदीची भूमिका साकारणाऱ्या मैथिलीने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविण्यास सुरुवात केली आहे. वेगळ्या धाटणीची संकल्पना प्रेक्षकांना या मालिकेतून बघायला मिळणार आहे. आनंदीचे निरागस प्रश्न, तिची हुशारी आणि चौकसता मालिकेमध्ये अनेक प्रश्न सोडवेल आणि प्रेक्षकांना अनेक प्रश्न स्वत:ला विचारण्यास भाग पाडेल यात शंका नाही. बऱ्याच वर्षांपासून बळी देण्याची प्रथा आपल्या समाजात आहे जी अत्यंत अमानुष आहे. एखाद्या प्राण्याचा, पक्ष्याचा वा माणसाचा बळी दिला की अमुक गोष्ट होते असा समज आहे. बऱ्याच लोकांनी या प्रथेविरोधात आवाज देखील उठवला पण, अजूनही ही प्रथा अस्तित्वात आहे. याच प्रथेविरोधात ‘बालपण देगा देवा’ मधील चिमुकली आनंदी आवाज उठवणार आहे.
वाचा : जाणून घ्या ‘ज्युनियर जी’मधून प्रसिद्धीस आलेला हा बालकलाकार सध्या करतोय तरी काय?
श्रध्दा जर डोळस असेल तर माणसाच्या जगण्याला आधार देते. माणूस श्रद्धेच्या बळावर अनेक अडचणींवर मात करू शकतो. पण अंधश्रध्दा माणसाचा घात देखील करू शकते. त्यामुळे तिला वेळीच मिटवणे गरजचे असते. पाण्याची समस्या, पाऊस कमी पडणे या समस्या महाराष्ट्रातील माणसाला माहिती नाही असे नाही. त्यामुळे गावामध्ये पाऊस पडावा, पाण्याची टंचाई भासू नये अशी प्रत्येक गावकऱ्याची अपेक्षा असते. आनंदी राहत असलेल्या गावामध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांची देखील अशी आशा आहे. कारण गावामध्ये पाण्याची टंचाई आहे, पाऊस देखील कमी पडतो त्यामुळे गावामध्येच राहणारा बिर्जे नावाच्या माणसाने देवाला सांगितले की यावर्षी पाऊस पडू दे त्यासाठी मी कोकरूचा बळी देईन. पाऊस पडावा म्हणून बिर्जे कोकरूचा बळी देणार असल्याची गोष्ट संपूर्ण गावामध्ये कळते. अण्णाच्या कानावर देखील ही बाब येते त्यांना या गोष्टीचा खूप राग येतो. गावामधलाच एक मुलगा जो आनंदीचा देखील मित्र आहे तो तिला ही गोष्ट सांगतो. आनंदीला ही गोष्ट चुकीची वाटते आणि सोनूच्या मदतीने ती त्या निष्पाप कोकरूचा जीव वाचवते. बिर्जेला आनंदी आणि अण्णा हे समजवून सांगतात की, एका निष्पाप जीवाचा बळी देऊन हे सगळ साध्य खरच होईल असं तुला वाटत का? हे चुकीच आहे. बिर्जेला त्याची चूक कळते.
वाचा : जाणून घ्या, विशेषाधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या ‘ट्युबलाइट’च्या छोट्या माटिनविषयी
एका मुक्या प्राण्याचा जीव घेऊन काहीच साध्य होतं नसते हा महत्त्वाचा संदेश ‘बालपण देगा देवा’ या मालिकेमधून समाजाला देण्यात येत आहे.