मनोबोधाच्या या अकराव्या श्लोकाचा आणखी एक वेगळा अर्थ दोन सत्पुरुषांनी लावला आहे. ते म्हणजे श्रीकाणे महाराज आणि भाऊसाहेब उमदीकर महाराज. ‘‘हे मना, तुझ्या अंत:करणात जगदारंभीच जी सद्वस्तू (आत्माराम) साठवून ठेवली ओ, जी सुखरूपी साठा आहे तिचा सद्विचारांच्या योगाने तपास कर. मग त्या आत्मारामाच्या दर्शनानं त्या आत्मवस्तूचा अखंड अविरत उपभोग घेत जा,’’ असं काणे महाराज या अकराव्या श्लोकाच्या अनुषंगानं सांगतात. भाऊसाहेब उमदीकर महाराज यांच्या बोधाच्या आधारे प्र. ह. कुलकर्णी यांनी ग्रथित केलेला अर्थ असा : ‘‘हे मना, तुला या जगात सर्वात सुखी कोणी ठेवले आहे, हे जाणून घे (जनीं सर्वसूखीं असा कोण आहे।) सद्गुरूंना विचारशील तर तूच नामस्मरणाने तुझ्यातच तू शोधून पाहा, असे ते उत्तरतील (विचारें मना तूंचि शोधूनि पाहें।।) पूर्वी केलेल्या तुझ्या पुण्याचं फळ म्हणून हा नरजन्म प्राप्त झाला आहे. या जन्मात शरीर साधनी लावून अनुभवानंद भोगण्याची संधी प्राप्त करून घे (मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें। तयासारिखें भोगणें प्राप्त जालें।। ) आता हा अर्थ सकारात्मक आणि प्रेरक आहेच. कारण साधकाला तो स्वत:च सर्वात सुखी आहे, हे तो सांगतो आणि अंतरंगात असलेल्या खऱ्या आत्मसुखाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतो. आपल्या चिंतनात उकलत गेलेला अर्थ हा मात्र साधनापथावर वाटचाल सुरू केलेल्या आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकाला सुख आणि दु:ख यांचं वास्तव स्वरूप समजून त्यापलीकडे जायला सुचविणारा आहे. सत्च्या, शाश्वताच्या विचाराची कास धरायला सांगणारा आहे आणि जेव्हा शाश्वताचाच विचार खोलवर सुरू होतो, शाश्वताचीच ओढ लागते तेव्हाच अशाश्वतातला फोलपणा खरेपणानं उमगतो. मग अशाश्वतातलं मनाचं गुंतणं संपू लागतं. एका लहान मुलाला चांद्या जमविण्याचा छंद होता. त्याच्या कपाटातल्या खणात एका पेटीत त्यानं शेकडो चांद्या साठवून ठेवल्या होत्या. कोणालाही तो या चांद्यांना हात लावू देत नसे. या रंगीबेरंगी चांद्यांना तो जिवापाड जपत असे. वय वाढत गेलं. खूप वर्षांनी त्यानं जुनं कपाट आवरायला घेतलं. आवरताना त्याला ती पेटी आणि तिच्यातल्या चांद्या दिसल्या. लहानपणच्या आठवणीनं तो हसला खरा, पण कचरा म्हणून त्यानं त्या चांद्या फेकून दिल्या! ज्यांना तो कधीकाळी जिवापाड जपत होता त्याच त्याला कचरा वाटल्या. अगदी त्याचप्रमाणे अनुभवानं, विचारानं, आकलनानं आपण मोठे होत गेलो, तर अशाश्वताचं खरं क्षणभंगूरत्व उमगू लागतं. मग त्यासाठीची धडपड, तळमळ, कळकळ, हळहळ कमी होत जाईल.. संपेल! मग शाश्वतातल्या खऱ्या सुखाकडे मन जाऊ लागेल. जगात खरं तर अंधार अशी गोष्टच नाही. उजेडाच्या अभावालाच आपण अंधार म्हणतो. पण दिवस-रात्र, उजेड-अंधार हे द्वैत तर रोजच अनुभवाला येतं. अगदी त्याचप्रमाणे दु:ख अशी खरं तर काही गोष्टच नाही. सुखाचा अभाव हेच दु:ख आहे. मग अंधारातही ऊर्जेच्या आधारावर माणूस जसा प्रकाशदिव्यांद्वारे उजेड निर्माण करतो त्याप्रमाणे दु:खाच्या प्रसंगातही आंतरिक ऊर्जेच्या आधारावर आत्मप्रकाशानं मन भरून टाकण्याचा अभ्यास का करू नये? तो केवळ सद्विचाराचीच अर्थात शाश्वत विचाराचीच कास धरल्यानं शक्य आहे, असं समर्थाचं जणू सांगणं आहे. मनोबोधाच्या अकराव्या श्लोकाचं विवरण आता संपलं. आता मनोबोधाच्या बाराव्या श्लोकाकडे वळू. सुख-दु:ख विश्लेषणात पुढचं पाऊल टाकत, हा श्लोक भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यात देहबुद्धीनं अडकून मन ज्या दु:खबंधनात आहे त्यावर थेट बोट ठेवतो आणि त्या दु:खबंधनातून सुटण्याचा उपायही सांगतो. - चैतन्य प्रेम