"काय झालं अचानक गप्प का झालास? तुला अजूनही अवघडल्यासारखं वाटतंय का? एरव्ही तर घरात वावरत असतोच. आज काय झालंय एवढं अवघडायला.? घाबरू नकोस मी तुला काही करणार नाही." नेहा उगाचच त्याची गंम्मत करत होती. पण त्यावरही ऋषी काहीच बोलला नाही. अनू त्याला मगाशी जे काही बोलली होती ते त्याला खूपच हर्ट झालं होतं. एकीकडे अनू आणि दुसरीकडे नेहासोबात लहापणापासून घालवले क्षण तो आठवता होता. "जर खरंच अनूने नेहाशी बोलणं बंद करायला सांगितल्यावर आपण काय करायचं?" हा विचार त्याला फारच अस्वस्थ करत होता. त्यातून मगाशीच अनूचा मेसेज पाहिल्यावर त्याची अवस्था आणखीच वाईट झाली होती. मगासपासून नेहासमोर तो आनंदी असल्याचा मुखवटा लावून वावरत होता, पण आता तसं करणं त्याला शक्य नव्हतं. "नेहाच्या घरी गेलास तर मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल" असा मेसेज तिने केला होता. अनू किती बालिश आहे हे त्याला चांगलं माहिती होतं. अजूनही आपण कॉलेजमध्येच आहोत अशीच ती वागत होती. त्यातून आपण पूर्ण रात्र नेहाच्या घरी राहिलो हे तिला समजल्यावर तर ती काय करेल या विचारानं तो आणखी अस्वस्थ झाला होता. शेवटी नेहानंच विचारलं "अरे ऋषी काही झालंय का? खरं सांग? अनूशी पुन्हा भांडलास ना? तिने मला बर्थ डे विश केलं नाही यावरूनच मी समजून गेले. तुमचं नक्की भांडण झालं असणार. सांग आता कशावरून भांडलात तुम्ही?" नेहानं विचारलं. "तुझ्यामुळे भांडलो." असं ऋषीला बोलायचं होतं पण तो शांत बसला कारण आज नेहाचा वाढदिवस होता आणि त्याला तिला दुखवायचं नव्हतं. पण नेहा म्हणजे मनकवडी आहे. तिच्यापासून काही लपून ठेवण्यात अर्थ नाही. शिवाय ती आपली चांगली मैत्रिण आहे तेव्हा आपण सांगितलंच पाहिजे आणि तिही समजूतदार आहे तेव्हा ती यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल याची ऋषीला खात्री होती. "नेहा.. एक सांगू तुला राग नाही ना येणार?" "तू मला २५ वर्षांपासून ओळखतो. कधी रागावले आहे का मी तुझ्यावर?" "नेहा.. माझ्यात आणि अनूमध्ये भांडण झालंय. पण यावेळी मात्र भांडणाचं कारण तू होतीस?" "मी?" नेहाला आश्चर्याचा धक्का बसला. "नेहा अनूला तू आवडत नाहीस.. तुझ्याशी कायमचं बोलणं बंद कर असं सांगत होती. ती हे आताच का बोलली, कशासाठी बोलली मला माहिती नाही. पण ती हट्टाला अडून बसली आहे. तुझ्याशी बोलणं बंद नाही केलं तर कायमची सोडून जाईल असं म्हणली. आता तूच सांग यावर मी काय करू? तुला माहितीय ना माझं अनूवर किती प्रेम आहे ते. तिच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकतं. ती माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही नेहा. पण तूही मला खूप महत्त्वाची आहेस. तू आणि मी एकत्र वाढलो. कोणालाही हेवा वाटेल अशी आपली मैत्री आणि ती अशी या स्टेजला मोडून टाकणं माझ्यासाठी अवघड आहे. आता तूच सांग मी काय मार्ग काढू" नेहा यावर काहीवेळ काहीच बोलली नाही. कदाचित अनू असं वागणार हे तिला कधीना ना कधी अपेक्षित होतंच. मुलाच्या आयुष्यात गर्लफ्रेंड आल्यावर तिला त्याच्या मैत्रिणींचा कधीना कधी त्रास होतोच. सगळ्याच काही चांगल्या नसतात. कधी कधी त्यांनाही इनसिक्युरिटी वाटतेच ना! त्यातून नेहासारखी सुंदर आणि आपल्यापेक्षाही वरचढ ठरणारी मुलगी असेल तर कोणत्याही मुलीला इनसिक्युरिटी वाटणारच ना! नेहा फारच समजूतदार असल्यानं तिने अनूच्या वागण्याचा कोणातही अर्थ काढला नाही.. बराचवेळ विचार केल्यानंतर ती शांतपणे म्हणाली.. "ऋषी तुझं अनूवर खूप प्रेम आहे ना? तू तिचा कोणताच शब्द पडू दिला नाही. तेव्हा तू यावेळीही तिचंच ऐक. तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करु नकोस आणि तुला तिच्यासोबत अख्ख आयुष्य काढायचंय. मी काय आज आहे उद्या माझं लग्न झाल्यावर मी निघून जाईन. पण तिची साथ तुला आयुष्यभर पुरणार आहे तेव्हा तू तिच.." पुढंच बोलपर्यंत नेहाचे डोळे काठोकाठ भरले होते. तिला पुढे एकही शब्द बोलता येईना.. तिनं आवंढा गिळला.. ती कितीही समजूतदार असली तरी शेवटी ऋषीचं तिच्या आयुष्यातलं स्थान खूप वेगळं होतं आणि एका फटक्यात त्याला दूर करणं तिच्यासाठी साधी गोष्ट नव्हती. पण ऋषीसाठी ती गप्प बसली. वाढदिवसाच्या दिवशी दोन अनपेक्षित धक्के मिळतील याची पुसटशी कल्पनाही तिनं केली नव्हती. उद्यापासून ऋषी आयुष्यात नसेल. तेव्हा त्याच्याशिवाय जगायंच ही मानसिक तयारी करण्यासाठी तिला पुरेसा वेळही तिला मिळाला नव्हता. पण या शेवटच्या क्षणी तिला ऋषीला काहीतरी सांगायचं होतं.. हे आता नाही सांगितलं तर आयुष्यात कधीच तिला आपल्या मनातल्या भावना सांगायची संधी मिळाली नसती. तेव्हा तिनं एक दीर्घ श्वास घेतला. "ऋषी जाता जाता एक गोष्ट सांगायची होती, जी मी तुला कधीच सांगितली नाही. पण आता या क्षणी सांगावीशी वाटते. सांगू?" ऋषीनं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि मान डोलावली. "ऋषी मला तू खूप आवडतो. आताच नाही पण शाळेपासूनच.. सगळयांना वाटायंचं की तुझं माझं लग्न व्हावं पण. असो माझ्यासाठी तू मित्रापेक्षाही खूप काही आहे. कदाचित माझ्या मनात तुझ्याविषयी असणारं प्रेम अनूलाही कळलं असलं तेव्हा मी तुझ्यात गुंतू नये म्हणून एक गर्लफेंड जो पझेसिव्हपणा दाखवते तोच तिनंही दाखवला असेल आणि यात तिची चूक नाही. मी अजूनही सिंगल आहे यासाठी कारण मी प्रत्येक मुलात ऋषी शोधत होते.." आता मात्र जे नेहाच्या तोंडून ऐकायला मिळालं तो ऋषीसाठी मोठा धक्का होता. यावर काय रिअॅक्ट करावं हे त्याला कळत नव्हतं. नेहाला त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा नव्हती. "नेहा तू हे आधी का नाही सांगितंलस?" "आधी सांगून काय होणार होतं. कॉलेजच्या पहिल्याच वर्षांत तूला अनू आवडली. तू माझ्याबद्दल निव्वळ चांगल्या मैत्रिणीपलिकडे काहीच विचार केला नाही. तेव्हा मी माझ्या मनातलं सांगितलं असतं आणि तू नाही म्हणाला असतास तर..? ही भीती मला होती. तू माझ्याशी बोलणं बंद केलं असतंस तर? ही दुसरी भीतीही मला होतीच. त्यामुळे तुला गमावण्याच्या भितीनं कधी हृदयातली गोष्ट ओठांवर आलीच नाही.." नेहाचा डोळे पाणावले. तिने हातानं डोळ्याच्या कडा पुसल्या. ऋषीनं काहीच विचार न करता नेहाला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातले अश्रू अलगत तिच्या चेहऱ्यावर ओघळले. तिनं मोठ्या मुश्किलीनं ऋषीच्या मिठीतून स्वत:ला सोडवलं. "ऋषी आता मला तुला गमावण्याची भीती नाही.. तू दादाच्या रुममध्ये जाऊन झोप आणि प्लीज उद्या मी उठायच्या आधी निघून जा.. नाहीतर मला खूप अवघड जाईल.' तिने उशीत आपलं तोंड लपवलं. चादर तोंडावर घेतली आणि झोपण्याचं नाटक करू लागली. ऋषी उठला आणि तिच्या बेडरुममधून बाहेर पडला. तिनं चादरी खालून त्याला शेवटंच डोळेभरून पाहून घेतलं आणि आपल्या आसवांना मोकळी वाट करून दिली. (समाप्त) - तीन फुल्या, तीन बदाम