मुंबईत बुधवारी १ हजार ३१० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार ५६३ जण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात ५८ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा बुधवारी १,०४,५७२ वर पोहोचला. आतापर्यंत ७५,११८ म्हणजेच ७१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

बुधवारी ५८ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा ५,८७२ वर पोहोचला आहे. बुधवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ३७ पुरुष आणि २१ महिलांचा समावेश आहे. यात ५ मृतांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी होते, तर ४१ जण ६० वर्षांवरील होते.

साडेचार लाख चाचण्या : मुंबईमध्ये आतापर्यंत साडेचार लाख चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातील २३ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. सध्याची सरासरी रुग्णवाढ १.१७ टक्के इतकी असली तरी दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलंड, नानाचौक-मलबार हिल आणि कुलाबा-चर्चगेट परिसरात वेगाने रुग्ण वाढत आहेत. बुधवारी एका दिवसात कांदिवलीत ९० रुग्ण आढळले.