२०१३च्या तुलनेत वाहनसंख्या १५.३३ लाखांनी वाढली;
दरवर्षी सरासरी साडेचार लाख वाहनांची नव्याने नोंदणी

शहरांतर्गत आणि आंतरशहर अशा दोन्ही भागांत गेल्या चार वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३मध्ये या विभागात एकूण ५२.३१ लाख वाहनांची नोंद होती. यात तब्बल १५ लाखांची भर पडली असून सध्या मुंबई महानगर प्रदेशात एकूण ६७.६४ लाख वाहने धावत आहेत. यात दुचाकी, चारचाकी, रिक्षा, बसगाडय़ा अशा सगळ्याच वाहनांचा समावेश आहे.

mv08कर्जासाठी अनेक योजना, सुलभ हप्ते, विविध नवनवीन आकर्षक मॉडेल यांमुळे चारचाकी कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यात आल्यापासून गेल्या काही वर्षांमध्ये या गाडय़ांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत फारशी सुधारणा होत नसल्याने या व्यवस्थेवर बहुतांशी अवलंबून असलेल्या मुंबई महानगर प्रदेशातील लोकांनी दुचाकीच्या खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे २०१३पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दरवर्षी या वाहन खरेदीत भर पडलेली दिसत आहे.

मुंबई महानगर प्रदेशात एकूण १०प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश आहे. यात मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि नव्याने सुरू झालेले बोरिवली ही चार; ठाणे, कल्याण, वाशी-नवी मुंबई, वसई, पनवेल, पेण-रायगड यांचा समावेश आहे. यापैकी वसई कार्यालयात २०१३ ते २०१६ या काळात सर्वाधिक वाढ निदर्शनास आली आहे. या कालावधीत वसईमध्ये वाहनांची संख्या साडेसहा पट वाढली आहे.

२०१३मध्ये या भागात ४२३१४ वाहनांची नोंद होती, तर २०१६मध्ये हा आकडा २६३१५० इतका आहे. वसईखालोखाल पनवेल भागातही वाहनांच्या संख्येत १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पेण-रायगड या विभागांचा अपवाद वगळता सर्वच विभागांमध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. पेण-रायगड येथे वाहनांची संख्या २२ टक्क्यांनी घटली आहे.