गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशीरा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.


“उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक चर्चा पसरत आहेत. परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळालेले नाहीत, त्याबाबातच्या सूचना आम्हाला मिळताच माहिती दिली जाईल.” अशा आशयाचं ट्विट सुतार यांनी केलं आहे.

करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लागू करण्यात आलेला लॉकडाउन शिथिल करण्यात आला. कंपनीतील 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येऊ देण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे अजून सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे 8 जूनपासून मोठ्या संख्येने प्रवासी एसटी, बेस्ट आणि स्थानिक बस सेवेतून प्रवास करत आहेत. पण डोंबिवली, नवी मुंबई, कामोठे, भाईंदर आणि मुंबई शहरातील अनेक बस स्थानकांवर लोकांची मोठी गर्दी होत आहे. म्हणजेच फिजिकल डिस्टंसिंग न पाळता लोकं प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत ही मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. पण, “उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक चर्चा पसरत आहे. ‘परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळालेले नाहीत, त्याबाबातच्या सूचना आम्हाला मिळताच माहिती दिली जाईल’, असे स्पष्टीकरण सुतार यांनी दिलं आहे.