मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहांमध्ये जॅमर लावण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विधी आणि महसूल समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी मांडला आहे. शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी हा प्रस्ताव मांडल्याने अभिनेता सुमीत राघवनने समाधान व्यक्त केलं आहे. नाट्यप्रयोग सुरू होण्याआधी मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा अशी विनंती केली जाते. मात्र रसिकांकडून हा नियम बऱ्याचदा पाळला जात नाही. त्यामुळे स्टेजवरच्या कलाकारांचे लक्ष विचलित होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. नाट्य रसिकांना कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद हा कोणत्याही अडथळ्याशिवाय घेता यावा म्हणून आपण हा ठराव मांडत असल्याचं शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे.

अभिनेता सुमीत राघवनने शीतल म्हात्रे यांचे हे पत्र आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवर हे पत्र पोस्ट करून हे पाऊल कौतुकास्पद आहे असंही म्हटलं आहे. ४ जून रोजी सुमीत राघवनने एक फेसबुक पोस्ट करून नाटकादरम्यान होणाऱ्या मोबाईलच्या रिंगबाबत आवाज उठवला होता. तुम्ही नाटकाचं तिकिट विकत घेतलं म्हणजे कलाकारांना विकत घेतलं का? मोबाईल वाजणार असतील तर आम्ही का नाटक करावं? आम्ही आमचा अपमान करण्यासाठी नाटक करावं का? असे प्रश्न सुमीत राघवनने फेसबुक पोस्टमधून विचारले होते.

सुमीत राघवनने जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांना आणि त्याने सुरू केलेल्या मोहिमेला अनेक नाट्यरसिकांनी आणि नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमीत राघवनची भूमिका कशी योग्यच आहे हे विविध उदाहरणं देऊन नेटकऱ्यांनीही सांगितले होते. आता शीतल म्हात्रे यांनी जे पाऊल उचलले आहे त्याचेही सुमीतने कौतुक केले आहे.

शीतल म्हात्रे यांनी जे पत्र पोस्ट केले आहे त्यावरही सुमीत राघवनने प्रतिक्रिया दिली आहे. जॅमरच्या फ्रिक्वेंसीमुळे साऊंड सिस्टीममध्ये काही बाधा येणार नाही ना? हे तपासून पाहिलं पाहिजे. (आजकाल सगळेच कलाकार लेपल वापरतात ) आणि तब्बेतीच्या दृष्टीने त्याचे काही दुष्परिणाम आहेत का हे पडताळून पहावे लागेल. For eg: hearing aid,pacemaker etc जर‌ एखादा प्रेक्षक वापरत असेल तर जॅमर मुळे काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार..