कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंना दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ खडसे यांच्या दाव्याचं खंडन केलं. तसंच त्यांच्याविरोधातला विनयभंगाचा खटला संपलेला नाही असंही सांगितलं. या प्रकरणी अजून आरोपपत्रच दाखल झालेलं नाही तर खटला संपला कसा असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारला आहे.

एकनाथ खडसे हे धादांत खोटं बोलत आहेत असाही दावा अंजली दमानिया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला. एवढंच नाही तर एकनाथ खडसे हे खुनशी प्रवत्तीचे आहेत असाही आरोप त्यांनी केला. मी भाजपाचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीही केला नाही असंही त्या म्हणाल्या. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले, त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकाराचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंना धडा शिकवण्यासाठी मी एफआयआर दाखल केला. त्यावर पुढे काहीही झालं नाही याला कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी सोयीचं राजकारण केलं. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यासोबत राजकारणी असंच राजकारण करतात असंही त्या म्हणाल्या.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. माझ्याबद्दल एकनाथ खडसे जे काही माझ्याबद्दल बोलले ते जर अमृता फडणवीस यांच्याबद्दल बोलले असते तर फडणवीस शांत बसले असते का? फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते, एका मुख्यमंत्र्याला ही भाषा शोभते का? असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.