राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात असं सूचक वक्तव्य भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार राजन तेली यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी हे भाष्य केलं. राजन तेली यांचे पक्षाच्या पलीकडे विविध पक्षात मित्रत्वाचे संबंध आहेत, त्याचाही उपयोग या ठिकाणी निश्चितपणे येईल असंही दरेकर म्हणाले. विधानपरिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेकरीता होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी आज भाजपच्या वतीने राजन तेली यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे दाखल केला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे नेते विनोद तावडे उपस्थित होते. राजन तेली यांनी विधानपरिषदेच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यांचा राजकीय अनुभवही दांडगा आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षामधील एक लढाऊ नेता या निवडणुकीमध्ये आम्ही उतरवला आहे असेही दरेकर यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील एक ताकदीचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच शपथ घेतील असं वाटलं होतं. नंतर शिंदे उपमुख्यमंत्री होती अशीही चर्चा होती. मात्र यापैकी काहीही घडलं नाही. एवढंच काय त्यांच्याकडे गृहखातं जाईल अशीही चर्चा होती, पण त्यांच्याकडे नगरविकास खातं सोपवण्यात आलं. या खात्याचे विभाजन होणार असेल तर एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात नाही ना अशा प्रकारची शंका उपस्थित होत आहे. असेही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.