मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’बाहेर पडावे : चंद्रकांत पाटील

मुंबई : करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपने शुक्रवारी ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे.

राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करीत निदर्शने करतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. करोना मुकाबल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे,पीपीई किट घालून ‘ मातोश्री ‘ निवास स्थानाबाहेर पडावे, असा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लगावला आहे.

केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकरी, मजूर, कामगार, बारा बलुतेदार व इतर अडचणीत आलेल्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी भाजपची मागणी आहे. मुंबईत परिस्थिती गंभीर असून रूग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी उपचारांची योग्य व पुरेशी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलनातील हा दुसरा टप्पा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

करोना चाचण्यांमध्ये लागण झालेल्या  रूग्णांचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट अधिक आहे आणि मुंबईत ते त्याहून अधिक आहे. एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या वजा केली तर मुंबईत करोनाची लागण झालेल्यांचे प्रमाण हे जवळजवळ २२ टक्के आहे. एकाच व्यक्तीच्या दोन वा तीनदा चाचण्या केल्या जातात.

करोना रूग्णांवर मोफत उपचारांची घोषणा करण्यात आली असताना अनेक खासगी रूग्णालयांकडून लाखो रूपयांची भरमसाठ बिलआकारणी करण्यात येत आहे. त्यांना महापालिकेकडून हजारो रूपये दरही निश्चित करून देण्यात येत आहेत. याप्रकरणी तातडीने लक्ष घालून खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची होत असलेली लुबाडणूक थांबवावी, अशी मागणीही फडणवीस यांनी  ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईत क्षमतेपेक्षा कमी चाचण्या का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबईत दररोज १० हजार करोना चाचण्यांची क्षमता असताना सध्या निम्म्याहून कमी म्हणजे चार—साडेचार इतक्याच चाचण्या करण्यात येत असून तरीही २२ टक्के रूग्णांना लागण झाल्याचे निष्पन्न होणे ही गंभीर परिस्थिती असल्याचे मत  माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त के ले.  मुंबईतील चाचण्या वाढविण्याची मागणी फडणवीस यांनी केली.