बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. दुसरीकडे जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई कऱण्यात येणार आहे. यावरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत एकामागोमाग प्रश्न विचारले आहे. बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहिले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “१०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबई मातेचा अपमान कोण करतंय? बेईमानी नेमकी कोण करतंय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा”.

आणखी वाचा- “…मगर याद रख बाबर, यह मंदिर फिर बनेगा”, कंगनाने केलं सूचक ट्विट

“मुंबई साखळी बाँम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रणौतच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना?,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आणखी वाचा- “… तर आमिर खान अलाउद्दीनच्या चटईवर बसून आलेला का ?”; भाजपाचा महापौरांना टोला

“भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना?,” असे प्रश्न आशिष शेलार यांनी विचारले आहेत.

आणखी वाचा- ‘कंगनाच घर दिसलं, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अनधिकृत बांधकाम दिसत नाही?’

“कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना?,” असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.