भाजपानं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली असून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावं, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांच्या वतीने दिला आहे.

उद्धव ठाकरे सत्यवादी हे मान्य, पण…

या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलताना “मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत” असं म्हटलं होतं. त्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.”

Pooja Chavan Case: “मुख्यमंत्री कुणालाही पाठिशी घालणार नाहीत”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!

डॉ. रोहिदास चव्हाण कुठे गायब आहेत?

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यवतमाळमधील रोहिदास चव्हाण नामक डॉक्टरांचा देखील उल्लेख केला. “नांदेडच्या पूजा चव्हाणचा गर्भपात यवतमाळमध्ये कसा झाला? आणि गर्भपात झाल्यापासून हे डॉ. रोहिदास चव्हाण कुठे गायब आहेत?” असा सवाल चंद्राकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, “पूजा चव्हाणचा मृतदेह वानवडीच्या रुग्णालयात नेला. त्या परिसरात १५० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वानवडी पोलिसांनी या १५ दिवसांत काय केलं याचा अहवाल द्यावा. ज्या दोघांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यांचं काय झालं? ऑडिओ क्लिप्सविषयी देखील प्रश्न उपस्थित होत आहेत”, असं देखील ते म्हणाले.