सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन भाजपा नेते निलेश राणे आक्रमक झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. तसंच आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात अशी शक्यताही व्यक्त केली आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव मर्डर मिस्ट्रीममध्ये आलं आहे. सुप्रीम कोर्टात संशयितांमध्ये त्यांचं नाव रेकॉर्डवर आलं आहे. हे तितकंच गंभीर आहे. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी तर दिलाच पाहिजे. मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरे, तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण…”

याआधी निलेश राणे यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी सुशांत प्रकरणावर काय म्हटलं आहे?
आदित्य ठाकरे यांनी आपलं नाव जोडलं जात असल्याने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअऱ करत प्रतिक्रिया दिली होती. “मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे