मुंबई : महाड येथील नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर पालिकेने २०१६ मध्ये शहरातील २७४ पुलांचा संरचनात्मक तपासणी अहवाल तयार करण्याचे हाती घेतलेले काम पूर्ण झाले असून त्यासंबंधीचा अहवाल येत्या दोन दिवसात आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालात शहरातील पुलांची चार विभागात वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. मुसळधार पावसात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याची घटना घडल्यावर मुंबईतील पुलांच्या स्थैर्यतेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने शहरातील उड्डाणपूल, रेल्वे रुळांवरून जाणारे उड्डाणपूल, पादचारी पूल, भूयारी मार्ग, नदी- नाल्यांवरील पुलांची पाहणी करण्याचे ठरवले. या कामाचा आवाका मोठा असल्याने व पालिकेकडे तेवढे मनुष्यबळ नसल्याने हे काम त्रयस्थ संस्थेला देण्याचे ठरले. सुरुवातीला २७४ पुलांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील दक्षिण भागासाठी ६३ लाख रुपये, पूर्व उपनगरांसाठी ३९ लाख रुपये तर पश्चिम उपनगरांसाठी १ कोटी रुपये शुल्क देण्यास स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. या अहवालात पूल तयार केल्याचे वर्ष, पूलाची लांबी-रुंदी- इतर माप, पूल तयार करण्याची पद्धती, पूलाची सद्यस्थिती आणि दुरस्तीसाठी आवश्यक खर्च यांची माहिती देणे अपेक्षित होते. संबंधित संस्थेने एप्रिल महिन्यात यासंबंधीचा अहवाल तयार केला. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका, सूचना यानुसार आता हा अहवाल सुधारित स्वरुपाता तयार करण्यात येत आहे. पुढील दोन दिवसात हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक पुलाच्या स्वतंत्र माहितीसोबतच दुरुस्तीची आवश्यकता नसलेले, किरकोळ दुरुस्ती, मोठय़ा प्रमाणातील दुरुस्ती आणि दुरुस्तीपलिकडे असलेले अशा चार प्रकारात पुलाचे वर्गीकरण करण्यात येत असून त्यानुसार तातडीने हाती घेण्याची कामे आणि दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येतील अशी माहिती आयुक्त मेहता यांनी दिली.