विविध पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल असलेला खंडणीखोर आणि बुकी पप्पू सावला या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. उद्यापासून या तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पप्पू उर्फ प्रकाश सावला हा सराईत खंडणीखोर आणि बुकी असून मुंबईच्या मिरारोड, पालघर, बोरीवली आणि अन्य पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त युनिट-११ संग्राम सिंह यांनी पप्पू उर्फ सावला याला मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तडीपारी दरम्यान पप्पू उर्फ सावला दोन जिल्ह्याच्या हद्दीत आढळल्यास पुन्हा तडीपारीची मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.