तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत. कुर्ला-मुलुंड दरम्यान स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. नेमका काय बिघाड झालाय त्याची अधिकृत माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली नाही.

कांजूरमार्ग जवळ एक लोकल बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. कल्याण आणि मुंबई दोन्ही दिशेच्या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या ऐन कामावर जाण्याच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.