लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: लोकलमधील गर्दीचे नियोजन करण्याकरीता शासकीय व खासगी कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करा, ही मागणी प्रवासी संघटनांकडून नुकतीच सामान्य प्रशासन विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर या विभागाने आपत्ती व्यवस्थापक विभागाला पत्र पाठवून प्रवासी संघटनांच्या निवेदनावर कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वच महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगीही देण्यात आली आहे. करोनाकाळात हा प्रवास सुरक्षितपणे व्हावा, यासाठी शासकीय व खासगी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करा, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. किमान करोनाकाळात आणि त्यानंतही कार्यालयीन वेळांत बदल केल्यास प्रवास सुकर होईल, अशी आशा प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

त्यासंदर्भातच प्रथम सामान्य प्रशासन विभागाकडे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने नोव्हेंबरच्या अखेरीस निवेदन दिले आहे. याशिवाय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या १०० टक्के अनिवार्य उपस्थितीचा फेरविचार करावा, उपनगरीय रेल्वेतून खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी द्यावी, कसारा-कल्याण व कर्जत-कल्याण या दरम्यान स्थानकामध्ये थांबा देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन सामान्य प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवले आहे. संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी कार्यालयीन वेळा बदलण्यासंदर्भातील मागणी पूर्वीचीच असल्याचे सांगितले.