उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी काम बंद केल्यास मुंबई ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. नागपूर येथे उत्तर भारतीयांच्या वार्षीक सभेत बोलताना निरुपम यांनी हे विधान केलं असून त्यांच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यासारखी सर्व कामं उत्तर भारतीय माणूस करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळं-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. हीच माणसं संपूर्ण मुंबई चालवतात. त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका. जर एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी ठरवलं तर मुंबई- महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो, पण तसं करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा अप्रत्यक्ष इशारादेखील निरुपम यांनी दिला.

उत्तर भारतीय लोक क्षेत्रीय मानसिकतेचे नाही तर राष्ट्रीय मानसिकतेचे असतात. गुजरातमध्येही उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहे. आज पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे. एक दिवस मोदींनाही वाराणसीला जायचे आहे, असंही निरूपम पुढे म्हणाले.