उद्योगमंत्री नारायण राणे यांचा एकेकाळचा कार्यकर्ता चिंटू शेख याने राणे आणि त्यांच्या वर्तमानपत्राविरुद्ध दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला असून त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून शुक्रवारी न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. हा दावा मागे घेण्यासाठी आपल्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नसल्याचे व आपसांत हा वाद मिटविल्याचेही शेख यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ‘स्वाभिमान’च्या कार्यालयात शेख याच्यावर २३ सप्टेंबर २०१० रोजी गोळीबार करण्यात आला होता. नीतेश यांनी आपल्यावर हा गोळीबार केल्याचा आरोप शेख यांनी केला होता. नंतर राणे पितापुत्राविरोधात उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. शेख याच्या आरोपानंतर ‘प्रहार’ या वृत्तपत्रात या शेखसाठी फरारी, तडीपार आणि तत्सम शब्दप्रयोग करण्यात आले होते. त्यामुळे शेख याने महादंडाधिकाऱ्याकडे राणे आणि वृत्तपत्राचे संपादक, मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा आधार घेत नंतर राणे आणि अन्य प्रतिवाद्यांविरुद्ध दावा भरण्यात आला. परंतु आपण आणि प्रतिवाद्यांनी आपसात हा वाद मिटवला असून तक्रार बिनशर्त मागे घेत असल्याचा सांगत शेखने तक्रार मागे घेतली आहे.