कंत्राटदारांचा कामचुकारपणा.. पालिकेचा निष्काळजीपणा!

कंत्राटदाराचा कामचुकारपणा आणि पालिका अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यामुळे देवनार कचराभूमीचा बोजवारा उडाला असून त्याचे परिणाम मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांना भोगावे लागत आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये ही कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने अंशत: बंद करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. याचा ठपका केवळ कंत्राटदारावर ठेवून पालिका अधिकारी हात झटकू पाहात आहेत. मुळात तेथे सुरू असलेल्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांनी पार पाडली नाही. म्हणूनच कचराभूमी आजघडीला धगधगत असून तेथे माफियांनी साम्राज्य थाटले आहे. आताही दररोज सुमारे १० हजार टन तयार होणाऱ्या मुंबईकरांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही योजना पालिकेकडे नाही. ती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मुंबईतला कचरा पेटतच राहणार आहे!

देवनारची कचराभूमी १३२ हेक्टर जमिनीवर पसरली आहे. मुंबईमध्ये दररोज ९६०० टन कचरा निर्माण होत असून त्यापैकी काही कचरा देवनार कचराभूमीत विल्हेवाट लावण्यासाठी टाकण्यात येतो. या कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्यामुळे त्यातील ६५ टक्के शास्त्रोक्त पद्धतीने अंशत: बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि या कामाची जबाबदारी ‘तत्त्व ग्लोबल एनव्हायरन्मेन्ट (देवनार) लिमिटेड’ या कंपनीवर सोपविली. त्याचबरोबर ५५ हेक्टर भागाभोवती संरक्षक भिंत उभारणे, प्रशासकीय इमारत, मुख्य रस्ता, अंतर्गत मार्ग, दिवे व पाण्याची व्यवस्था इत्यादी कामे या कंपनीवर सोपविण्यात आली होती. याशिवाय प्रतिदिन एक हजार टन क्षमतेची दोन खतनिर्मिती केंद्रे उभारणे, लीचेट प्रक्रिया केंद्र व दोन शास्त्रोक्त कटराभूमींची निर्मिती करणे ही कामे या कंपनीला करावयाची होती.

कंत्राटदारांचा कामचुकारपणा

कचराभूमीत येणारा कचरा योग्य पद्धतीने पसरवून त्यावर माती थर टाकणे आणि त्यावर रासायनिक प्रक्रिया करणे बंधनकारक होते. अशा पद्धतीने येथे येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची होती; परंतु कंत्राटदाराने या पद्धतीचा अवलंब केलाच नाही. कचराभूमीत येणाऱ्या कचऱ्याचे ढिगावर ढीग साचविले. त्यामुळे आजघडीला येथे ३० ते ४० फूट उंचीचे कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. या ढिगाऱ्यात मिथेन वायू तयार होत आहे. त्यामुळे अधूनमधून छोटय़ा-मोठय़ा आगी लागण्याचे प्रकार येथे घडतच असतात. गेल्या बुधवारी कचराभूमीतील २५ हेक्टर जागेतील कचऱ्याने पेट घेतला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या धुराचा फटका मुंबईतील बहुतांश विभागांतील नागरिकांना बसला. कचऱ्यावर मातीचा थर असता तर ही आग खालपर्यंत पोहोचू शकली नसती आणि अग्निशमन दलालाही ती विझविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली नसती. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मातीचा लवलेशही नसल्याने आग थेट खालपर्यंत पोहोचली आहे. मिथेन वायूच्या संपर्कात आग येताच त्याचा भडका उडत आहे.

पालिकेचा निष्काळजीपणा

‘तत्त्व ग्लोबल एनव्हायरन्मेन्ट (देवनार) लिमिटेड’कडे सहा वर्षांपूर्वी देवनार कचराभूमी सोपविण्यात आली होती. या सहा वर्षांमध्ये कंपनीने कोणती कामे केली याकडे पालिकेचे लक्षच नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये कचराभूमीतील दरुगधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होताच सामाजिक संस्था, राजकीय नेते आणि रहिवाशांनी आवाज उठवायला सुरुवात केली. त्या वेळी पालिकेला जाग आली आणि कंत्राटदाराने न केलेल्या कामाचा पाढा वाचायला पालिकेने सुरुवात केली. मुळात सुरुवातीपासून पालिका अधिकाऱ्यांनी येथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला असता तर कंत्राटदाराला वेळीच वेसण घालता आली असती आणि आज हा प्रश्न निर्माण झाला नसता, असे मत काही जाणकार व्यक्त करू लागले आहेत.