किती दिवस झाले एखाद्या पुस्तकाविषयी विचार करून? एखाद्या मित्राशी लेखक/ लेखिकेच्या शैलीविषयी गप्पा मारून? एवढ्यात कधी वाचलात जुन्याच पुस्तकातला आवडता भाग पुन्हा? हे प्रश्न तुम्हाला कोणी विचारले तर तुमच्यापैकी किती लोक 'काय्य वाच्चन करायचो पूर्वी माहित्ये?पण आजकाल ना वाचायचंच राहून जातं" किंवा किंवा 'यु सी वर्क लोड इज रियली गेटिंग टफ नाऊ अ डेज, आय हार्डली गेट टाईम फॉर रीडिंग "किंवा” यार फेसबुकवरचे वाचनच येवढं होतं ना, अवांतर (?) वाचनच होत नाही आता”. ही उत्तरे ऐकून समोरची व्यक्तीही कदाचित तुमच्या सुरात सूर मिसळेल..पण खरं सांगा अशी उत्तरं तुमच्या स्वतःच्या मनाची समजूत घालतात? घालत असतील तर ठीक,पण ही उत्तरे जर तुमच्या मनाला पटत नसतील,आणि वाचन पुन्हा सुरु करायची इच्छा असेल तर आता एक वेगळा मार्ग आहे आपल्याकडे. हे सगळं वाचताय म्हणजे तुमचे एक फेसबुक अकाऊंट तर नक्कीच असणार?मग सामील व्हा एका आगळ्यावेगळ्या वाचन चळवळीत. नाव आहे #वाचन_परिक्रमा. फेसबुकवर ‘hashtag’ वापरून एवढे दिवस हॉटेल्स,थेटरचे चेक इन केलेत.आता आपल्याला #वाचन_परिक्रमा वापरून मराठी,हिंदी,इंग्लिश पुस्तकातले साहित्य वाचता येईल. युनेस्कोचा जागतिक पुस्तक दिन असतो आज २३ एप्रिलला. त्यानिमित्त नुकताच सुरु केलेला हा उपक्रम आहे. ह्यावर #वाचन_परिक्रमा वापरून,आपल्याला भावलेले (स्वतःचे सोडून इतर) मराठी, हिंदी, इंग्लिश लेखक, लेखिकांचे पुस्तकातले उतारे, कविता पोस्ट करता येतील; त्यावरचे तुमचे भाष्य पोस्ट केलेत तर वाचकांना त्यातला नेमका भावार्थही लक्षात येईल. अगदी स्वतःच्याच फेसबुक वॉलवर.ह्या आठवड्यापासून जगभरातल्या लोकांनी अMe पोस्ट करायला, वाचायला सुरुवात केलीये. जेव्हा वेळ असेल तेव्हा दुसऱ्यांनी पोस्ट केलेले साहित्य वाचा, खात्री आहे नक्की आनंद मिळणार तुम्हाला. कारण मुळात हा उपक्रमच सुरु केलाय, एका वाचनप्रेमीनी जगभरातल्या साहित्यप्रेमींना आनंद देण्यासाठी.ह्या आनंदाचे मूल्य पैशात कोणालाच मोजता येणार नाही,त्यामुळे ह्यासाठी पैसे शून्य. उपक्रमाचे फायदेही अमर्यादित आहेत. तुम्हाला भावलेले साहित्य तुम्हाला जगभरातल्या समान आवडीच्या लोकांच्या समोर सादर करता येतं. त्यातून नव्याने पुस्तके, मासिके विकत, ग्रंथालयातून घेऊन वाचली जातील.कित्येक अनोळखी लेखक, लेखिका ओळखीचे होतील, वाचनकक्षा रुंदावेल, वाचनाचा आवडता छंद पुन्हा वाढेल.पुस्तकावर भाष्य करताना कित्येक नवीन लेखक,लेखिका,समीक्षक तयार होतील.हे सगळं करताना वाचन आणि पुस्तक,ग्रंथालय व्यवसायाला आपण नकळतपणे हातभार लावत जाऊ. अहो जर पुस्तके छापणारे, विकणारेच टिकले नाहीत तर उद्या पुढच्या पिढीपर्यंत पुस्तक पोचवणार तरी कोण? पटलय का? मग या. #वाचन_परिक्रमा उपक्रमात आपलं स्वागत आहे. - अंबर कर्वे