मुंबई दूरदर्शनचे माजी उपकेंद्र संचालक आणि ज्येष्ठ निर्माते आनंद बाळाजी देशपांडे ऊर्फ आकाशानंद यांचे गुरुवारी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आणि कन्या आहे. दूरदर्शनवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘ज्ञानदीप’ या कार्यक्रमाची निर्मिती त्यांची होती.त्यांनी कारकिर्दीची सुरुवात नागपूर आकाशवाणी केंद्रावरून केली. मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर १९७२ मध्ये ते मुंबईला आले. सुरुवातीला त्यांनी ‘ऐसी अक्षरे’ तसेच ‘शालेय चित्रवाणी’ची निर्मिती केली. ‘ज्ञानदीप’ने मात्र त्यांच्या कारकिर्दीला झळाळी दिली. या कार्यक्रमाच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रात १५० हून अधिक ‘ज्ञानदीप मंडळे’ स्थापन झाली. अमिता भिडे यांनी ‘ज्ञानदीप’वर ‘पीएच.डी.’ मिळविली तर ‘बीबीसी’च्या एलिझाबेथ स्मिथ यांनी १९८८मध्ये ‘ज्ञानदीप’वर लघुपट केला होता. आकाशानंद यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ यासह ‘हिरवी शाई’, ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘टेक वन टेक टू’ आदी पुस्तके तसेच बालसाहित्यही लिहिले होते.