सध्या करोनाची सतत बदलणारी रुपं, करोनानंतरचे आजार यांनी आपल्या सर्वांनाच जेरीस आणलं आहे. धडधाकट व्यक्तीलाही हा करोना गिळून टाकत आहे. पण मुंबईतल्या एका व्यक्तीची ही कहाणी वाचून तुम्हाला या सगळ्याशी लढण्याची प्रेरणा मिळेल. करोना, ब्लॅक फंगस, अवयव निकामी होणं अशा तीन शत्रूंशी लढून, विजयी होऊन हा वीर सुखरुप घरी परतला.

५४ वर्षांचे भारत पांचाल हे गेल्या ८५ दिवसांपासून म्हणजे जवळपास तीन महिन्यांपासून ही लढाई लढत होते. करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी म्हणजे ८ एप्रिलला त्यांना ताप यायला सुरुवात झाली. चारच दिवसांमध्ये त्यांच्या फुफ्फुसाला गंभीर संसर्ग झाला आणि एका आठवड्यातच त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवावं लागलं. करोनाचं गांभीर्य ठरवणारा त्यांचा CT स्कोअर हा २१ वरुन २५ वर पोहोचला होता.

त्यानंतर लवकरच पांचाल यांचे अवयव निकामी होण्याची भीती वाटून लागली. त्यांच्या किडनीला हानी झाली. यकृत काम करेनासं झालं, फुफ्फुसांची गंभीर समस्या निर्माण झाली आणि त्यातच ब्लॅक फंगसचा संसर्गही झाला. ७० दिवसांपासून पांचाल हे व्हेंटिलेटरवर होते. ते उपचार घेत असलेल्या हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की एका करोना रुग्णाला जे काही होतं, जे होण्याची शक्यता असते, तो प्रत्येक संसर्ग पांचाल यांना झाला आहे. गेल्या दीड वर्षात कोणी रुग्ण एवढा काळ रुग्णालयात दाखल आहे असं झालेलं नव्हतं.

डॉक्टरांनी रेमडेसिविर पासून प्लाज्मा थेरपीपर्यंत प्रत्येक गोष्ट केली. प्रत्येक प्रकारचे उपचार केले. पण कशाचाच परिणाम होत नव्हता. शेवटी त्यांच्या फुफ्फुसातून रक्त यायला सुरुवात झाली. तेव्हा तर पांचाल यांच्या परिवाराने आशाच सोडून दिली होती. पण १५ दिवसांतच त्यांनी पुन्हा उभारी घेतली आणि या सगळ्या संकटांमधून बरे होऊन घरी परतले.