दक्षिण मुंबईतील काही रस्ते अस्वच्छ प्रसाद रावकर, मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांमध्ये कामचुकार आणि दांडीबहाद्दरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे मुंबईची स्वच्छता अडचणीत येऊ लागली आहे. ऐन दिवाळीमध्ये दक्षिण मुंबईमधील काही रस्त्यांच्या सफाईची जबाबदारी असलेले निम्मे कामगार कामावरच न आल्यामुळे साफसफाईच्या कामाचा ताण उपस्थित कामगारांवर पडू लागला आहे. सफाई खात्यातील दांडीबहाद्दरांची संख्या वाढू लागल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे मुंबईमध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागावर असून या विभागाने मुंबईच्या साफसफाईसाठी सफाई कामगारांची मोठी फौज पालिकेच्या सेवेत सज्ज ठेवली आहे. हे सफाई कामगार दररोज सकाळी मुंबईत साफसफाईचे काम करीत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सफाई कामगारांमध्ये दांडीबहाद्दरांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या स्वच्छतेवर होऊ लागला आहे. दक्षिण मुंबईच्या एका टोकाला असलेल्या हॉर्निमन सर्कल ते मादाम कामा मार्ग, के. बी. पाटील मार्ग, कुपरेज, काळा घोडा, जगन्नाथ भोसले मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, महात्मा गांधी मार्ग, वीर नरिमन मार्ग या परिसराची स्वच्छता करण्यासाठी पालिकेने ९७ कामगारांची फौज तैनात केली आहे. मात्र ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यापैकी ४१ कामगारच कामावर हजर असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी ९७ पैकी ११ कामगारांची साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे ८६ कामगार कामावर हजर असणे अपेक्षित होते. मात्र सहा कर्मचारी गेले अनेक दिवस कामावरच आलेले नाहीत, तर १८ कामगारांनी नैमित्तिक आणि तातडीची रजा घेतली होती. तसेच कार्यालयाला कोणतीही माहिती न देता १४ कामगार अनुपस्थित होते. त्यामुळे या परिसराच्या साफसफाईचा ताण उपस्थित असलेल्या ४७ कामगारांवर पडला होता. नरिमन पॉइंट परिसराला समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने देशीविदेशी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येत असतात. नरिमन पॉइंट परिसरातील समुद्रकिनारा आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता राखली जावी यासाठी पालिकेने ९५ सफाई कामगारांची फौज तैनात ठेवली आहे. आयुर्विमा महामंडळ परिसर, दिनशॉ वाच्छा मार्ग, जे. टाटा मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, फ्री प्रेस जर्नल मार्ग, जमनालाल बजाज मार्ग, बॅ. रजनी पटेल मार्ग, मादाम कामा मार्ग, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग परिसरात साफसफाई करण्याची जबाबदारी या ९५ कामगारांवर आहे. मात्र दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केवळ ४१ कामगार कामावर उपस्थित असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ९५ पैकी आठ जणांची साप्ताहिक सुट्टी होती, तर सहा पदे रिक्त आहेत. उर्वरित कामगारांपैकी ११ जण गेल्या अनेक दिवसांपासून कामावरच आलेले नाहीत. १५ जण नैमित्तिक रजेवर होते, तर १४ जणांनी पालिका अधिकाऱ्यांना न कळवताच रजा घेतली होती. कामावर गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे साफसफाईवर परिणाम होत असून उपस्थित कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. - किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय